भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

शकपूर्व चौदाव्या शतकात आर्यांचा अंमल मितानी देशावर असण्याच्या सुमारास अरेमियन लोकांनी आर्य अक्षरसमाम्नाय बहुशः घेतला असावा आणि तोही मोडून तोडून अर्धाकच्चा केला असावा. मूलस्थानातून हिंदुस्थानात येऊन राहिल्यामुळे, मूलस्थानांत भौगर्भिक अदलाबदल झाल्यामुळे व मधील टापूत अद्याप शोध व्हावयाचा असल्यामुळे आर्यांच्या रेखाचित्रांचा व रंगचित्रांचा वगैरे पत्ता लागलेला नाही. तत्रापि पाणिनीपूर्वी आर्यांनी वर्णसमाम्नाय शोधून काढलेला होता यात बिलकुल संशय नाही. हीच पाणिनिकालीन वर्णमाला अपभ्रंश होत होत महाराष्ट्रात बालबोध या संज्ञेने प्रचलित आहे. १०. विचारसूचक अभिनय विचारप्रदर्शनार्थ साधन म्हणून ध्वनीपासून मनुष्याने एका पाठीमागून एकएक शोध करून महत्कालांतराने भाषा निर्माण केली व चित्रांपासून अक्षरे निर्माण केली. ह्या दोन सृष्ट्या उत्पन्न करण्याच्या प्रारंभाच्याही पूर्वी तिस-या एका साधनाचा मनुष्याने उपक्रम केला. ते साधन हावभाव ऊर्फ विक्षेप हे होय. ह्या साधनाचा प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी उल्लेख केला आहे. या साधनाची प्राथमिक मनुष्यांत जी स्थिती होती तीच स्थिती सध्याही आहे. भाषा व अक्षरे यांच्या अवाढव्य प्रगतीमुळे विचारप्रदर्शन व व्यवहार करण्याच्या कामी हे साधन सुधारण्याची आवश्यकता नव्हती, आणि भाषा व अक्षरे यांच्या अभावी आवश्यकता असती तत्रापि भाषा व अक्षरे जे ब्रह्मांड काम करतात ते करण्याची या साधनाची क्षमताही नाही. तत्रापि बोलण्याला पोषक दुजोरा म्हणून याची विचारप्रदर्शनाच्या कामी ज्यांना भाषा कळत नाही त्या पशुपक्ष्यांशी व्यवहार करण्याच्या कामी, व भाषा आणि अक्षरे यांनी जे विचार व विकार प्रदर्शित करता येणे मुष्कील आहे ते विचारविकार दाखविण्याच्या कामी, ह्या साधनाचा मनुष्यप्राणी अतिशय उपयोग करीत आलेला आहे व त्यास त्याने व्यवहारक्षमताही आणलेली आहे. नैसर्गिक हावभावांचे परिणत व कृत्रिम रूप म्हटले म्हणजे ज्यास अभिनय म्हणतात तो होय. अनुकरणात्मक ध्वनीचे भाषा हे जसे परिणत व कृत्रिम रूप, किंवा अनुकरणात्मक रेघांचे अक्षर हे जसे परिणत व कृत्रिम रूप, तसेच अनुकरणात्मक सहज विक्षेपांचे अभिनय हे परिणत व कृत्रिम रूप आहे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries