भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(८) केवळ पाशवावस्थेत एक पुरुष व अनेक स्त्रिया असा समाज असे. नंतर यूथावस्थेत अनेक पुरुष व अनेक स्त्रिया सरमिसळ राहून समाज घटला. पुढे आवडनिवड सुरू होऊन मिथुनावस्था हळूहळू अमलात आली आणि शेवटी एक पुरुष आणि एक स्त्री अशी व्यवस्था बहुत प्रयासाने प्रचलित झाली. ती अद्याप भारतीय समाजात पूर्णपणे अमलात यावयाचीच आहे. हाच अर्थ शांतिपर्वाच्या २०७ व्या अध्यायात पुराणेतिहासज्ञ जे भीष्म त्यांनी खालील श्लोकांत वर्णिला आहे.
कृतयुगे ... ... ...॥

न चैषां मैथुनो धर्मो बभूव भरतर्षभ ।।
संकल्पादेवैतेषां अपत्यमुपपद्यते ॥ ३७ ।।
ततस्त्रेतायुगे काले संस्पर्शाज्जायते प्रजा ।।
न ह्यभून्मैथुनो धर्मस्तेषामपि जनाधिप ।। ३८ ॥
द्वापरे मैथुनो धर्मः प्रजानामभवन्नृप ।।
तथा कलियुगे राजन् द्वंद्व मापेदिरे जनाः ॥ ३९ ॥

(१) कृतयुगी स्त्री-पुरुषांच्या मनात आले म्हणजे समागम होत असे. आई, बाप, भाऊ, बहीण, हा भेद नव्हता. हीं यूथावस्था होय. (२) त्रेतायुगात स्त्रीपुरुषांनी अन्योन्य स्पर्श केला म्हणजे समाज त्या स्त्रीपुरुषांना तेवढ्यापुरता समागम करण्यास परवानगी देई. ही आवडीनिवडीची किंवा इष्टा-निष्टावरणावस्था होय. (३) द्वापरयुगी मैथुन-धर्म सुरू झाला. म्हणजे टोळींत जोडप्याजोडप्यांनी स्त्रीपुरुष राहू लागले, परंतु अद्याप या जोडप्यांना स्थिरावस्था प्राप्त झालेली नव्हती. (४) आणि कलियुगात द्वंद्वावस्था परिणतीस आली, म्हणजे विवाहसंस्था म्हणून जीस म्हणतात ती उदयास आली. इतक्या प्राचीन काली समाजशास्त्रीय परंपरा इतकी नामी सांगणा-या भीष्माविषयी सध्या देखील परम आदर उत्पन्न होतो !

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries