भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(६) असे हे एकंदर नाटक व नक्कल आहे. ही नक्कल क्षुद्र व बीभत्स आहे हे अश्वमेध करणारे राजे व ऋत्विज जाणीत. दधिक्राव्णो अकारिषम् या मंत्रात आपण केले ते नाटक बीभत्स होते असे ते स्पष्टच कबूल करतात. परंतु हा बीभत्सपणा पूर्वपरंपरेला अनुसरून करणे अवश्य असल्यामुळे यज्ञपुरुष आपले बरेच करील, वाईट करणार नाही, अशी त्यांची खात्री होती. बीभत्स भाषणे केल्याबद्दल यज्ञ याजकाचा काय फायदा करीत असेल तो असो, समाजशास्त्रज्ञांचा मात्र या बीभत्स नाटकापासून एक निश्चित फायदा होतो. त्यांना वैदिक ऋषींच्या रानटी पूर्वजांच्या चालीरीतींचे ज्ञान होते व ही बीभत्स भाषणे नमूद करून ठेवल्याबद्दल संहिताकाराचे ते ऋणी बनतात. यज्ञभूमीवर मैथुनविषयक बीभत्स नाटक पूर्वजापासून चालत आलेली परंपरा म्हणून वैदिक ब्राह्मण, क्षत्रिय करीत, नित्यव्यवहारातील परिपाठ म्हणून करीत नसत. वेदकालांत राजे व ब्राह्मण संभावित शिष्ट असत व असभ्य भाषा वापरण्याला भीत असत, परंतु यज्ञ प्रकरणात धार्मिक परंपरा म्हणून बीभत्स शब्द, हावभाव व वागणूक करणे त्यांना श्रेयस्कर व इष्ट वाटत असे. परंपरा म्हणून समाजात हे असले प्रकार अवशिष्ट राहतात व खपतात. उदाहरणार्थ, विवाहसमयी नव-या मुलाच्या अंगावर पायतणे फेकण्याची कित्येक युरोपियनांची चाल, किंवा होळीत अचकट विचकट शब्द उच्चारण्याची ब्राह्मणादी हिंदूंतील चाल, किंवा लगतच्या दोन गावातील मुलींनी गावशिवेवर जाऊन एकमेकीचे बापजादे व आया माया उद्धंरण्याची गावंढ्याची चाल. ह्या चाली परंपरा म्हणून चालत आलेल्या आहेत व समाजाला खपतात इतकेच. या चाली काय दाखवितात ? पुरातन युरोपियनांच्या एका टोळींतील पुरुष दुस-या टोळीतील रत्रीला बळजबरीने पळवून नेत असता, हिचे भाऊबंद त्या धर्षक पुरुषाला बडवीत, असे अनुमान पहिल्या चालीवरून आपण काढितो.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries