प्रस्तावना

त्याप्रमाणें ह्यावेळीं त्याच्या हातून कांहींच घडून येईना. सदाशिवरावभाऊनें त्याला चुचकारून, दरडावून, स्तुति करून, रागें भरून, टोंचून, खोचून, नानाप्रकारें लिहिलें; परंतु काम न करण्याचें आपलें व्रत त्यानें काहीं सोडलें नाहीं. पेशव्यांचें साहाय्य युक्तीनें, प्रयुक्तीनें, बहाण्यानें व शिताफीनें न करण्याचा उद्योग त्यानें साधेल तितका केला. बोलण्यांत व लिहिण्यांत मात्र गोड शब्द वापरण्याला कसूर केली नाहीं. पैसे लवकरच पाठवून देतों, सांगाल काम तें ताबडतोब करितों, वगैरे मायन्यादाखल वाक्यांनीं सजविलेली पत्रें त्यानें सदाशिवरावभाऊला सतत लिहिलीं (लेखांक २०६, २६४). त्यामुळें भाऊचें मन गोविंदपंताविषयी नरम राहिलें. बाकी गोविंदपंताचे हें कुचराईचें वर्तन सदशिवरावभाऊच्या ध्यानांत आलें नाहीं असें नाहीं. ह्या गृहस्थाच्या हातून कामें नीट होऊन येत नाहींत हे भाऊ जाणून होता. त्याला त्यानें ह्याच वेळीं काढून टाकावयाचें, परंतु, तसें एकदम करणें दुरापास्त होतें. मल्हारराव होळकर व जनकोजी शिंदे ह्यांच्या खालोखाल वजनदार माणून म्हणजे गोविंदपंतच होता. गोविंदपंताला काढिलें म्हणजे त्याच्या जागी ह्या सरदारांपैकीं कोणी तरी त्याच्या प्रांतांत पाठविणें जरूर होतें. परंतु हे दोघे सरदार गेल्या लढाईत अगदीं हैराण झाले होते. तेव्हां त्यांना आपल्या जवळच ठेवणें भाग होते. शिवाय, ह्या सरदारांच्या सैन्यांला घेतल्याशिवाय आपल्याला अबदालीशीं बरोबरीच्या नात्यानें सामना करता येईल अशी भाऊची समजूत नव्हती. ह्याकरिता गोविंदपंताला एकाएकी तोडणें भाऊला प्रशस्त वाटेना. तशात गोविंदपंत अगदीच कांहीं उपयोगी पडणार नाहीं असें भाऊचें मत नव्हतें. यवनांच्या द्वेषानें, शिपाईगिरीच्या नैसर्गिक तडफेनें, लोकांच्या लज्जेनें व धन्यावरील स्वामिभक्तीनें प्रोत्साहित होऊन गोविंदपंत आपली बाजूस सांभाळील असा भाऊचा तर्क होता. थोडें कडक बोललें, थोडासा धाक दाखविला म्हणजे गोविंदपंत ताळ्यावर येईल व सांगितलेली कामगिरी बजावील असा भाऊचा अंदाज होता. ह्याच तर्कावर व अंदाजावर भिस्त ठेवून सदाशिवरावभाऊनें गोविंदपंताला अंदर्वेदींत राहू देऊन त्याच्याकडे आणीक काहीं कामगि-या सोपविल्या.

यमुनानदीला पाणी अतिशय आल्यामुळें व जड सामान नेण्यास नावा वेळेवर न मिळाल्यामुळें सदाशिवरावभाऊला यमुना उतरून अबदालीचें पारपत्य करण्याचें साधलें नाहीं. तेव्हां त्यानें शत्रूच्या पारपत्याची दुसरी योजना केली. अबदाली, नजीबखान व सुजाउद्दौला हे ह्यावेळी दिल्लीजवळ यमुनेच्या उत्तरतीराला शिकंद-यावर जाऊन बसले होते. त्यांच्या पाठीला गंगानदी असून तोंडाला यमुना नदी होतीं. डाव्या बाजूला सकुराबादपर्यंत जाटांची, मराठ्यांची व गोविंदपंताचीं ठाणीं बसलीं होतीं. उजव्या बाजूला मात्र वेळ पडल्यास सरहिंदाकडे निसटून जाण्यास त्यांना मार्ग होता. सदाशिवरावाला यमुना उतरतां आली असतीं तर त्यानें अबदालीला पूर्वेकडून पश्चिमोत्तरेकडे रेटीत नेलें असतें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries