मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६४९

श्री. (मसूदा.) १७२५
मार्गशीर्ष वद्य ५

श्रीमंत राजश्री पंत प्रधान यां प्रतिः-

रामचंद्र दीक्षित व लक्ष्मीनारायण दीक्षित कृतानेक आशीर्वाद. येथील क्षेमे ता मार्गशीर्ष कृष्ण पंचमी पावेतों क्षेत्र कायगांव येथें खुशाल असों. विशेष, माधवराव त्र्यंबक दीक्षित पटवर्धन याचा काळ जाल्याचें वर्तमान ऐकून चित्तास खेद जाला. ईश्वरेच्छा प्रमाण ! देवाब्राह्मणांचें संस्थान आणि आपले पदरचे, त्यापक्षीं त्यांचा अभिमान आपणांसच आहे. संगोपान करून संस्थान चालविलें पाहिजे. बहुतां ब्राह्मणांचें हें ठिकाण आहे. आह्मीं पूर्वापार पुणियास येतों तेव्हां या स्थळाव्यतिरिक्त कोठें राहत नाहीं. वर्षदोन वर्षेपावेतों राहणें जालें, तरी आतिथ्य आदर औपचार येथेंच होतो. ऐसें बहुत विप्रमंडळीचें स्थळ आहे. यांची स्त्री गरोदर आहे. बहुत ब्राह्मणांचे आशीर्वादें पुत्रच होईल. तथापि ब्रह्मसूत्र प्रमाण. धर्मसंस्थापना कृपाळु होऊन केली पाहिजे सारांश, हें देणें आह्मां ब्राह्मणांस दिलें पाहिजे. बहुतां दिवसांपासोन धर्माचे स्थान आपलें आहे. देवब्राह्मणाचे संस्थानाचे संरक्षण करणार आपण आहेत. कारभारी बहुत दिवसांचे. त्र्यंबकराव दीक्षित यांजपासून चांगलेच आहेत. दीक्षितांचा काळ जाला, तें समई माधवराव दीक्षित पांच वर्षांचे होते. त्या दिवसापासून कारभारी यांनी अकृतृमी सेवा करून व्यवहार चालविला. हें सर्वश्रुत असेलच. प्रस्तुतहि तेच कारभारी आहेत. निर्वाहा करणें आपल्याकडे आहे. बहुत काय लिहिणे ? हे आशीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries