१ पत्रे भाद्रपद शुध्द ७ आणिली, बाबांस सांगितले. आज पाहू, उद्या पाहू. ऐसे म्हणता, पित्रुपक्ष होऊन गेला. तेव्हा त्रयोदशी वद्यपक्षी रात्री हरि सिध्देश्र्वर यांस बोलावून वाड्यांत नेले आणि पुशिले की, पत्रे आणिली पहा म्हणता; परंतु आम्ही एकीकडे पत्रे पाहत नाही, एकांतात पाहिल्याने संशय पडतो, त्यास सभेमध्ये पाहू, याचे काय उत्तर ते करणे. त्याजवर आपण विनंति केली की, भटजीस बोलवावे आणि पेशजी नकला एकांतात पाहिल्या तैसे असल पत्रेही पहावी, सभेत पहावी त्यास न्याय नाही. ते समयी बाबा बोलले की, सभेत न पाहवी तेव्हा चोरीचे काम आहे की कायॽ त्यास आम्ही उत्तर केले की, आपली मर्जी असेल त्याप्रमाणे पहावी. आम्ही म्हणतो परंतु आपण करतील ते मान्य आहे, एकांती पहावी किंवा सभेत पहावी, परंतु एक विनंति की विचक्षण गृहस्थ असल्यास चिंता नाही. त्यास बाबांनी सांगितले की, सारे सभेत राहू. वाद्यादेखत पाहू. त्याजवर मागती विनंति केली की, आपण म्हटले ते कबूल, परंतु वाद्यादेखत या वेळेस पत्रे न पहावी; आपण पाहिल्याने वाद्याची निशा आहे, मग त्याचेदेखत पहाणे कशास व्हावेॽ ते समयी त्रिंबकपंत वगैरे गृहस्थ बोलले की, हे गोष्ट स्वामींनीं योग्य करावी, वाद्यादेखत न पहावी. ते समयी मेघःश्यामपंत उठोन विनंति करू लागले की, स्वामी! आपण पत्रे पहावी आणि जे सांगाल, ते मान्य आहे. ऐसे बोलून उठून गेले. उपरि बाबा बोलले की, हरिपंत मान्य झाले की सभेत पत्रे वाचावी ऐसे लिहून ठेवावे. त्यावर लिहून ठेविले आणि वद्य १४ चे दिवशी भटजीस व विठ्ठलराव अण्णास सर्वांस बाबांनी जमा केले की, पत्रे पहावी. ते समयी मागती बाबा म्हणो लागले की, एक वेळ मेघःश्पंताचे कच्चे वर्तमान ऐकिले पाहिजे. ते समयी भटजींनी बाबास विनंति केली की, आजपर्यंत झाले आणि मागती प्रथम दिवस हे काय, वर्तमा ऐकिलेच नाही म्हणजे काय, निश्र्चय ठरला त्यावरून पत्रे आणिली आणि हाली प्रथम वर्तमान पुसता हे कायॽ त्यास बाबा बोलले की त्रिंबकपंतास पुसावे की, तुमचे वर्तमान काय आहे ते सांगणे. त्याजवर मेघःश्यामपंत बोलले की, आमचे वर्तमान नवे नाही, पूर्वीच सांगितले आहे, तीन गोष्टी, दौलत व घोडी व इनाम यांतून काही आहे ऐसे म्हणावे, नाही ऐसे म्हटले तरी पायांवर डोई ठेवून उठोन जाईन, दुसरी गोष्ट शपथपूर्वक नाही. ऐसे बोलून त्रिंबकपंताशी मोठ्याने बोलू लागले. ते समयी बाबांस राग आला आणि म्हणो लागले की, तुम्ही थोरांचे वंशीचे, तुमचे श्रीमंत सोयरे खरेच, आम्ही तुमचे खातरेत नाही, परंतु वाद सांगावयासी येऊन ऐसे बोलणे बोलता बोलता हे काय, आम्ही राग एकीकडे ठेवून जे पुसतो ते यथास्थित लेहून देणे, नंतर मनास आणू. त्याजवर त्रिंबकपंतास सांगितले की, पंताची जबानी तपशीलवार लेहून घेऊन रा सदाशिवभट दात्ये याजला दाखवून आपल्याजवळ घेणे, नंतर पत्रे पाहू. ऐसे ठऱविले. उपरि घरास उठून आले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries