गोपाळराव गोविंद यांची मर्दुमी बहुत जाहाली. श्रीमंत नानासाहेब मेहेरबान होऊन चौघडेयाची बहाली जाहाली. चौघाडा सुरू केला. सन ११६५ सीत खमसैन मया व अलफ साली साबनुराकडे हाकीमखान पठाण याजवर फौज रवाना. तमाम लष्कर समागमे घेऊन, सावनूर प्रांती शाहा देऊन, लष्कर छावणीस राहून, तमाम प्रांतांत ठाणी घातली. त्या मोहिमेत समग्र दोन साले गुदरली. सन ११६७ समान खमसैन या साली मागती निजामअल्लीचा लढाईचा दम भारी होऊन लढाईस उभे राहिले. श्रीमंताचे फौजेची तयारी होऊन अवरंगाबादचे मैदानी लष्करचा मोकाबला मातबर जाहला. जायाजखमी बहुत जाहाले. परंतु उभयतां क्षेमरूप आपलाले स्थळांस जाऊन राहिले. सन ११६८ तिसा खमसैन मया व अलफ त्या साली श्रीमंतांचा पुणेच्या मुकामी मुकाम जाहाला. स्वारीस बाहीर निघाले नाही. छावणी जाहली. त्यांचे मातोश्री राधाबाईचा काळ कार्तिक मासी वद्य पक्षी जाहला. सन ११६९ सितैन मागती निजामअल्ली लढाईस फौजबंदी तांदुळज्याच्या मुकामी उभा राहिला. श्रीमंत भाऊसाहेब फौजबंदी करून, लढाईस तयार होऊन, उभयतांची लढाई बरीच जाहाली. निजामअल्लीची खराबी बहुत जाहाली. हिरमोड जाहाला. श्रीमंत भाऊसाहेब यश घेऊन, फौजबंदी करून, समागमे नानासाहेब यांचे पुत्र विश्र्वासराव सहवर्तमान हिंदुस्थानचे मुलूक काबीज करणेबद्दल स्वारी तयारी होऊन गेले. ते सन ११७० पौष मासपरर्यंत लढाया त्या देशी जाट वगैरे जागा जागा राजे होते त्यांशी लढाया होत गेल्या. पौष शुध्द पक्षी भाऊसाहेबाच्या फौजेचा व हिंदुस्थानचे फौजेचा मुकाबला भारी लढाई होऊन, श्रीमंत भाऊसाहेब यांची फौज समग्र जाटांनी बुडवून लोक अगदी लुटले गेले. विश्र्वासराव जनकोजी सिंदा व भाऊसाहेब आदिकरून बुडाले ते फिरोन देशास आले नाहीत. त्यांचे कुमकेस नानासाहेब फौजबंदी करून मजलदरमल नरमदातीरापावेतो गेले; तो तिकडे लढाई मातबर होऊन खासेसुध्दा फौज बुडविली हे वर्तमान नानासाहेबांस येऊन दाखल जाहाले; त्यामुळे नानासाहेब यांचे चित्तांत बहुत खेद होऊन, अहोरात्र विश्र्वासराव यांचे व भाऊसाहेब यांचे क्षणाक्षणा स्मरण होऊन, सहा महिनेपरयंत बहुत शरीर कृश जाहाले. देह अवसानास गोष्ट आली. ऐसे जाणोन गोपाळराव गोविंद यांनी पुण्यास जावयाची विनंति करून फौजसुध्दा पुण्यस्थलास आले. ते सर्वच थोडके दिवसांत देलोकाप्रती गेले. सन ११७१ अवल साल त्यांचे पुत्र धाकटे माधवरावसाहेब यास राजदर्शनास नेऊन, वस्त्रे देऊन, त्यांचे नावचे शिक्के सिध्द जाहले. राज्य करावयास आज्ञा जाहाली. त्या वेळेस त्यांची उमर वर्ष एकोणीस होती. निजामअल्लीचा व माधवरावसाहेबाचा लढाईचा आरंभ जाहाला. उभयतांची लढाई मातबर जाहाली. निजामअल्लीचा भाऊ मोगलअल्ली व रामचंद्र जाधवराव दोघे श्रीमंताकडे निघोन गेले. निजामअल्लीची हलाकी पडली. सिकस्ता जाहला. पुढे सन ११७२ साली श्रीमंतामधे व गोपाळरावामधे बेबनाव जाहाला. याजमुळे घोडनदीवर उभयतांची लढाई जाहाली. नंतर गोपाळराव फौजसुध्दां निघोन मिरजेस आपल्या ठिकाणास आले. सवेच पाठसी श्रीमंत दादासाहेब व माधवरावसाहेब फौजसुध्दा मिरजनजीक कृष्णातीरी मार्कंडेश्र्वरसंनिध लष्कराचा मोकबला करून किल्यास मोर्चेबंदी केली. किल्लेमारी गोविंदपंत नाना सामानसुध्दां लढाईस सिध्द जाहाले. सवीस दिवसपरयंत लढाई दररोज मातबर होत गेली. लोक जाया जखमी जाहाले. दरम्यान नारो शंकर यांनी मधेस्त होऊन गोविंदपंत नाना यांस किल्ले मंगळवेढे येथे रहावयास देऊन किल्ला मिरजच्या सरकारांत घेतला. हे हकीकत लिहिली सही.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries