मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १११.

१६९७ मार्गशीर्ष शुद्ध ६.

राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यांस :-
सु।। सीत सबैन मया व अलफ. आलीकडे तुह्मांकडून विनंतिपत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. मेस्तर टेलर याजकडून आजपर्यंत पत्र यावें तें कांहीच दिसत नाहीं. खासा स्वारी इंग्रेजी सामानसुद्धां तापीवर सोनगडानजीक दाखल जाली. तमाम देशीहून राजकारणें आलीं आहेत. कोंडाईवारी चढतांच कितेक मुत्छदी व सरदार येऊन सामील होणार. त्याव, करनेल किटण म्हणतात कीं चिखली परगणियांत जाऊन रहावें. त्यास स्वारीचा रोख माघारा फिरलियानें मसलतीचा अनुपयोग, राजकारणें उठतात व परगणियांत राहिल्यानें शौरत येक प्रकारची जाती. सरकारचे व इंग्रेजाचे एखलासांत दरज पडली, ऐशा कल्पना करोन फितुरी उमेदवार होतील. कितेक हुजूर येणार ते नाउमेद होवून केलेली पैरवी सोडतील- इत्यादिक नकसानी. याजकरितां येथून माघारे कुच होत नाहीं, म्हणून करनेलीस साफ सांगितलें आणि जनरलास ये बाबेविसी तपशीलवार लेहून पाठविलें असे. यांची नक्कल तुह्मांस मजकूर कळावा येतदनिमित्य पा। आहे. तरी साद्यंत समजोन, जनरालासी बोलोन, बारी चढोन गुजराथ व खानदेश याचे दरम्यान भोडगांवावरी जावयाविसीं यास परवानगी घेऊन पाठवावी. लढाईखेरीज दाबानेंच हतवीर्य होवून मसलतीचा उपयोग पडतो. तें काय निमित्य न करावें ? बारीचे आसपास राहिल्यास चिंताही नाहीं. देशांत दहशत पडोन फितुरी जमणार नाहीं ही तर मोठी सोय आहे. सहजांत न लढतां काम होतें, तें काय ह्मणून न करावें ! जनरालाचे कुमकेनें मोठा आब वाढला. ऐसेंच न लढतां इंग्रेजी सामानसुद्धां पुढें गेलों तरी कोण्ही सन्मुख येत नाहीं. विरान जातात. ऐसा प्रकार असतां करनेल परवानगीचा उजूर करितात. माघें फिणावयाविसीं दुराग्रह करितात. यांत सारी मसलत बिघडती. मिळविल्या यशाचा दाब कमी पडतो व चिखलींत राहिल्यानीं माहालहि खराब होतो. ऐवजाची वोढ, येक जागा राहिल्यानें फौजेच्या पोटाची सोय नाहीं. हे सर्व अर्थ समजाऊन पुढें बोललों. बळें जावयाविसीं सत्वर यास परवानगी पाठवून देणें व तेथील वर्तमान अधिकोत्तर असेल तें लिहिणें, जाणिजे छ ४ सवाल.

(लेखनावधि.)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries