मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

जमीन कशी तयार केली.
प्रकरण २ रें.

“मराठ्यांचा अभ्युदय केवळ आकस्मिक गोष्टी घडून आल्यामुळेंच झाला, त्यांचा उत्कर्ष व्हावा असा त्यांच्या अंगीं मुळींच जोम नव्हता, दैवगति अनुकूळ नसती तर, त्यांचें नांवसुद्धां ऐकूं आलें नसतें,'' अशा प्रकारचीं विधानें बहुशः सर्व इतिहासकारांनीं केलेलीं आहेत. ग्रँट डफ साहेबांनीं तर, मराठ्यांच्या भरभराटीस सह्याद्रीवरील वणव्याचीच उपमा । दिली आहे. ज्याप्रमाणें अरण्यास एकाएकीं वणवा लागतो व तो आपोआप शांत होतो, तद्वतच मराठ्यांचा पराक्रमाग्नि पेटला व शांत झाला, असें ते म्हणतात; परंतु केवळ अलंकाराच्याहौसेमुळेंच या उपमेचा त्यांनीं उपयोग केला असावा असें वाटतें. कारण, पूर्ण विचारांतीं जर त्यांचें असें मत बनलें असतें तर, १७ व्या शतकापासून मराठ्यांच्या उत्कर्षाचा पाया कसा बसत चालला, हें व्यक्त करून दाखविण्यास, आपल्या इतिहासाचे पहिले तीन भाग त्यांणी मुळीच खर्च केले नसते. वस्तुत: नीट विचार केला तर, आकस्मिक गोष्टींवर मराठ्यांचा उदय बिलकुल अवलंबून नाहीं. मुसलमानांनी महाराष्ट्र काबीज करण्यापूर्वी, कितीएक शतकांपासून मराठ्यांच्या प्रगतीस प्रारंभ झालेला आहे. ह्या प्रगतीचीं सर्व कारणें नीट समजून घेणें असल्यास डाक्तर भांडारकरांनी गोळा केलेले ताम्रपट व शिलालेख यांचें नीट मनन केलें पाहिजे. या अमूल्य सामग्रीचा उपयोग केला ह्मणने मुसलमान लोकांची सत्ता झुगारून देण्याचा प्रयत्न प्रथमतः महाराष्ट्रांतच कां झाला व मराठ्यांच्या देशस्थितींत व संस्थांत असा काय गुण होता, कीं त्यामुळें त्यांच्या वरील प्रयत्नास यश आलें, या दोन गोष्टींचा उलगडा तेव्हांच होतो. |महाराष्ट्राची स्वभावतःच ठेवण अशी आहे कीं, त्यांत रहाणा-या लोकांचा उत्कर्ष झालाच पाहिजे. ह्या देशाच्या पश्चिमेस मह्याद्रि पर्वत आहे व उत्तरेस विंध्याद्रि व सातपुडा हे पर्वत आहेत. ह्या पर्वतांच्या लहान लहान शाखा देशांत चोंहीकडे पसरल्यामुळें व या शाखांच्या द-याखो-यांतून उगम पावणान्या लाखों लहानसहान नद्यांचें सर्वत्र एक नाळेंच बनल्यामुळें, देश बराच डोंगराळ, उग्र व ओबडधोबड झालेला आहे. भूगोलदृष्ट्या कोंकणाचा--समुद्र आणि सह्याद्रि यांमधील पट्टीचा ---महाराष्ट्रांत समावेश होतो. पर्वताच्या शिखरावरील प्रदेशास। घांटमाथा ह्मणतात व खालील प्रदेशास देश अशी संज्ञा आहे. बहुतेक टेकड्यांवरून किल्ले बांधलेले आहेत व त्यामुळें देशाचा बचाव स्वभावत:च होतो. मराठ्यांच्या राजकीय उलाढालींत ह्या किल्यांनीं फारच महत्वाची कामगिरी बजावली आहे. देशाचें स्वरूप असें असल्यामुळें, तेथील हवा फारच चांगली असून उत्साहजनक आहे. गंगा व सिंधु ह्या नद्यांच्या सपाटीवरील प्रदेशासारखी महाराष्ट्राची हवा निस्सत्व नाहीं प्रदेश डोंगराळ आहे, त्यामुळें जमीन असावी तशी सुपीक नाहीं. पण लोक सशक्त, काटक व काटेकोर आहेत. महाराष्ट्राचें एकंदर क्षेत्रफळ एक लक्ष चौरस मैल असून लोकसंख्या तीन कोटी आहे. महाराष्ट्राचा आकार एका काटकोनत्रिकोणासारखा आहे. दमणपासून कारवार पर्यंत सह्याद्रि पर्वत व समुद्र हा ह्या त्रिकोणाचा पाया. सातपुड्याच्या आरंभापासून ते तहत गोदावरी नदीच्या मुखापर्यंतचा प्रदेश ह्याची लांब बाजू. व गोदावरीच्या मुखापासून ते कारवारपर्यंत मराठी भाषा प्रचलित असणारा प्रदेश या त्रिकोणाचा कर्ण. अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्र देश उत्तर हिंदुस्थान व दक्षिण द्वीपकल्प यांच्या अगदी नाक्यावर असल्यामुळें, यास इतिहासांत फारच महत्व आलें आहे. म्हैसूर व माळव्याकडील प्रदेशाची स्थिति कांहींशी महाराष्ट्रासारखी आहे. पण ते प्रदेश एका बाजूस असल्यामुळें, महाराष्ट्राइतकें त्यास महत्व नाहीं. देशाच्या या स्वाभाविक स्वरूपापेक्षां तेथें रहाणा-या लोकांच्या स्वभावाचाच ह्या देशाच्या इतिहासावर फार परिणाम झालेला दिसतो. उत्तर हिंदुस्थानांत आर्य लोकांचा प्रसार अधिक झाल्यामुळें, तेथील मूळ रहिवासी लोक बहुधा नामशेष झाले आहेत. द-याखो-यांतून हे लोक क्वचित् सांपडतात. दक्षिण द्वीपकल्पांत तर मूळच्या द्राविड लोकांनी आपलें वर्चस्व सोडलें नाहीं. आर्य लोकांना आपला पगडा तेथें बसवितां आला नाहीं. महाराष्ट्रांतील लोकसंख्येंत या दोन्ही जाती सारख्या प्रमाणांत मिसळल्यामुळें, दोन्ही जातींतील अवगुण नाहींसे होऊन, गुण मात्र तेथील लोकांत उतरले आहेत. या गोष्टीचें उत्तम दर्शक ह्मणने मराठी भाषा होय. मराठी भाषेचें मूळ रूप द्राविड आहे; पण आर्य लोकांनीं तिच्या रचनेंत बदल करून तीस पूर्णत्वास आणलें आहे. उत्तरिहिंदुस्थानांतील लोकांप्रमाणें महाराष्ट्रांतील लोक गोरे, नाजूक व बांधेसूद नाहींत ; परंतु दक्षिणेंतील द्राविड लोकांप्रमाणें ते काळे व कुरूपही नाहींत. महाराष्ट्रांतील हल्लींच्या आर्य लोकांत, मूळचे आर्य व नंतर आलेले सिथिअन यः। दोन जातींचें मिश्रण आहे. अनार्य लोकांत मूळचे रहिवासी भिल्ल, कोळी, रामोशी व उच्च द्राविड या दोन जातींचें मिश्रण आहे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries