मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

निम्में रोटी अर्धी सूर्याराव पिसाळ याचे पुत्र पदमसिंगराव याचे हाती निम्में दिली. त्याजवरी तेच प्रसंगीं निम्में देशमुखीचें वतन निम्मेचें पत्र सूर्याराव याशीं करून दिलें. वांई देशांतील गांव निम्में निम्में तारोतार व इसाफती व इनाम तारोतार निम्में वांटून दिलें असे. दत्ताजी नाईक यांणी सूर्याराव याशी शिक्यानिशी आपल्या हातें कागद करून दिला. त्यावर दत्ताजी नाईक बोलिले जें :- एक शिक्का असूं देणें. त्यांस सूर्याराव बोलिले जें :- तुह्मी निम्में देशमुखीचा शिक्का करणें आह्मी निमें देशमुखीचा शिक्का करूं. त्याजवरून उभयतांचे भांडण लागलें. त्याजवरी महाराज छत्रपति स्वामी मोंगलाईहून या प्रांती आले. त्यांस तुळापुरी मुक्कामी दत्ताजी नाईक जाऊन स्वामीस गैरवाका विदित करून सारे देशमुखीची पत्रें करून घेतली. धनाजी जाधवराव यांचे विद्यमानें पत्रें घेतली. हें वर्तमान सूर्याजीराव याशी विदित नव्हतें. हें वर्तमान सूर्याराव याशी कळिल्यावरी सूर्याराव याणीं थोराताचे हातें राजे बुवा थोरात यांचे हातें महाराज छत्रपति स्वामीचें दर्शन घेतलें. सदरहू देशमुखीची हकीगत सदरहू प्रो सांगितली. आणि मोगलाईत असता ही महाराज छत्रपती स्वामीसही वर्तमान दाखल होतें. त्यास स्वामी बोलिले जें :- तुमचे निम्में देशमुखीचें वतन तुमचे तुह्मास देऊं. निमें दत्ताजी नाईक यास देऊं. ऐसा करार होऊन मजल दरमजल सातारियाशी आले. तेथून पुढें मजल दरमजल पन्हाळियाशी गेले. तेथून पंचगंगेवर गेले. तेथें धनाजी जाधवराव याणीं स्वामीस अर्ज केला जे :- वाई देश खराब झाला आहे. अवघे देशक बरोबर आहे. याशी कौलें, वस्त्रें, घेऊन रवाना करणें, ह्मणोन अर्ज केला. त्याजवरून दिवटयाच्या सलामाच्या समई वस्त्रें सदरेस आणविली. ते समई धनाजी जाधवराव सेनापति याणी स्वामीस अर्ज केला जे :- दत्ताजी नाईक देशमुख याशी वस्त्रें देणें. त्याजवरून महाराज स्वामीनीं मंदिलाचा पदर घेऊन हात वर केला. ते समई सूर्याराव याणीं महाराज स्वामीस थोरले महाराज स्वामीनीं द्वाही दिली कीं, दोही हातीं दोन मंदिले घेऊन दोघांचे हातीं दोन पदर देणें. त्यास धनाजी जाधवराव बोलिले जे :- दत्ताजी नाईकास वस्त्रें देणें. मग सूर्याराव याणी धनाजी जाधवराव याशी जाब दिला जे :- मी कांही जाधव यादव नव्हे! तुह्मी कऱ्हाडची देशमुखी दहा हजार रुपयाची घेतली! ऐसा कांही आपण नव्हें! आपण आहे तो दत्ताजी नाईकाचा तुरा आहे! तुरुकहांडीस देशमुखी पडली होती. त्यास दरबारखर्च लाखोलाख रुपये खर्च करून एक जातीच्या दोन जाती पाहोन देशमुखी सोडविली. त्याजवरून महाराज छत्रपति यांचा मंदिलाचा हात वरता होता तो मांडीवर ठेविला. त्याजवरी गती धनाजी जाधवराव महाराज स्वामीस बोलिलें जे :- दत्ताजी नाईक याशी वस्त्रें देणें. त्यास महाराज स्वामी बोलिले जे :- दोही देत असतां बळजोरीनें वस्त कसें द्यावें. आधीं वाद्याची समजावणी करणें. तोवर वस्त राहूं देणें. मग तमाम कचेरी गेली. त्याजबरोबर सूर्यारावही गेले, आणि कचेरीचे बाहेर बसले. मग महाराज स्वामीनीं सूर्याराव याची याद केली. जगंनाथ चोपदार याशीं आज्ञा केली की, सूर्याराव कोठें आहेत, त्यास बोलाऊन आणणें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries