मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१५८]          पै॥ आषाढवद्य ३, आदितवार.                                  श्री.                                                      १५ मे १७५१.

चिरंजीव राजश्री बाबूराव याप्रती गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरी येथील कुशल त॥ ज्येष्ठ शुध्द १ मु॥ कनवज श्रीगंगातीर येथें उभयतां सरदारांजवळ सुखरूप असो. विशेष. यानंतर तुह्मी, बहुत दिवस जाले परंतु काहींच वर्तमान लिहिले नाहीं. याजवरून तुह्मांस काय ह्मणावें? देशी गडबड, वर्तमान येत नाहीं, याजकरिता चिंता प्राप्त जाली. त्यास, आमचे जासूद, काशीद, न पावले तर तुह्मी अजूरदार करून शहरी पत्रें वर्तमान लिहून पाठवावीं. तेथून ते सागरीं पावतीं करितील. परंतु वरचेवर वर्तमान लिहित जाणें. कालीं एक पत्र तुमचें दीड महिनेयाचें आले. त्यांत दमाजी गायकवाड लुटलेयाचें (वर्तमान) आले. त्यास, एक जुंज जालें, त्याजवर वर्तमान काय जाले? श्रीमंत भागानगरप्रांतीं गेले, निजामअल्लीशीं व श्रीमंताशीं भेट जाली, त्याचे व श्रीमंताचें कसकसे सौरश जाले? श्रीमंतास निजामअल्लीनें काय दिल्हें ? पैका, मुलुख व किल्ले - तें सविस्तर लिहिणें. दमाजी सातारा होता, श्रीमंताच्या फौजाही सातारी होत्या. यास, काय वर्तमान जाले तें लिहिणें. श्रीमंत भागानगराहून आलेच असतील. त्यास, दमाजीचें पारपत्य कोणप्रकारें जालें ? व मातुश्री ताराबाईशीं सख्य अथवा काय कसे जाले ? ते सविस्तर लिहिणे. इकडील वर्तमान तर, पठाण व रोहिले दोनी फौज मातब्बर बुडविली. पातशाही जमीदार अगर अमीर हे दोन्ही होते. याजला बुडवितांच पातशाहास मोठा वसवसा जाला जे श्रीमंत र॥ नानांची फौज इकडे आली त्यामुळे हे पातशाही बुडवितात, मोडितात, तेव्हा आता मराठेयाहून आणीक कोणी तब्बर नाहीं. त्यास वजिराचें वर्तमान तर, वजिरांत कांहींच पीळ नाहीं, तिळत्र मर्दुमी राहिली नाहीं, निर्माल्य जाला आहे. जर करितां श्रीमंत राजश्री नानास्वामी अगर श्रीमंत राजश्री भाऊस्वामी कोणी एकजण असतें, तर आजीं पातशाहीचा मामला हलका पडला होता. या समयीं मातब्बर कार्य पातशाहापासून करून घ्यावयाचा समय होता.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries