मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

चकनामा इनामाचा शके १६२५ सुभानुनाम संवत्सरे माघ शुध्द २ भानुवासरे ते दिवशी खंडोजी बिन येसाजी पाटील दाभाडे मौजे तळेगाव तर्फ चाकण, सरकार जुन्नर, यांसी लिहून दिल्हा चकनामा ऐसाजे :- तुह्मांस महाराज राजश्री छत्रपतिस्वामी कृपाळू होऊन मौजेजकुरी इनाम जमीन चाहुर पांच दिल्ही. त्याचे आज्ञापत्र मौजेजकुरास सादर जालें ऐसाजे :- स्वस्तिश्री राज्याभिषेक १७, प्रजापतिनाम संवत्सरे, चैत्र शुध्द १४, सौम्यवासरे, आज्ञा केली ऐसीजे :-खंडोजी बिन येसाजी पाटील दाभाडे, मोकदम, मौजे तळेगांव तर्फ चाकण, सरकार जुन्नर, यांस महाराज कृपाळू होऊन मौजेजकुरी इनामजमीन चाहुर पांच रास दिल्हा असे. सदरहू इनाम वंशपरंपरेने खाणें. कोणीं हरकत करील त्यास श्री डोळेश्वराची शपथ असे, आणि बेताळिसा पूर्वजांची आण असे, गोहत्या ब्राह्मण हत्येचे पातक असे. हा इनामाचा चकनामा लिहून दिल्हा. खंडोजी दाभाडे यांस पुत्र तिघे, वडील त्रिंबकराव, मधले यशवंतराव, धाकटे सवाई बाबूराव, खंडेराव दाभाडे यांस मुतखडयाचे आजाराने मृत्यू आला. मौजे तळेगाव येथे थडगे आहे. त्यांचे मागे त्रिंबकराव दाभाडे यांस सेनापतीची वस्त्रे जालीं. कारकून मंडळीस वस्त्रे बरहुकूम खंडेराव दाभाडे यांचे कारकीर्दीस जाली त्याप्रमाणे जाली. ते समयी यशवंतराव यांस सेनाखासखेलीचीं वस्त्रें जालीं. नंतर त्रिंबकराव दाभाडे सेनापति गुजराथेंत मोहिमेस जात होते तेसमयीं बाजीराव बल्लाळ प्रधान यांणी डभईचे मुक्कामी युध्दप्रसंग केला. तेथें हत्तीचे पायीं अंदू घालून तुंबळ युध्द केले. प्रात:काळापासून अस्तनापर्यंत लढाई होत होती. त्या हत्तीवरील महावत गोळी लागोन मेला. नंतर खासे यांनी जातीनिशी तिरंदाजी करून युध्द केले. ते समयीं कमानीच्या चिल्याने बोटांची कातडी उडोन गेली. लढाई शिकस्त जाली. नंतर भावशिंगराव टोके यांचे बारगिरानें दगा करून जोड गोळया मारल्या. त्या मस्तकी बसल्या. त्यायोगे मृत्यू रणी हत्तीवर पावले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries