मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

अतीत, ब्राह्मण, कितेक फकीर फौजेत होतें. त्यांजला नानाप्रकारें द्रव्य, अलंकार देऊन, बाहेर बिदा करून दिल्हे. श्रीमंत भाऊसाहेब हत्तीवरून उतरोन अमरसाहित्य अंगातील काढोन टाकून, जिमा घातला. एक तलवार फिरंग घेऊन घोडयावर स्वार जाहाले. जयजय, हरहर शब्द संपूर्ण फौजेत जाहाला. शिपाई, वीर यांणी दरोबस्त तरवार मेणांतून बाहेर केली. तयार जाले. आह्मी आपले मिसलेस मातोश्री पार्वतीबाईस घेऊन गेलीं, तों अबदलअल्ली, अगस्ती, सैन्यसागरशोषक, फतेनिशाण पुढें देऊन, जे ठिकाणी उभा होता तेथून गलबल पाहून, एकसमयावच्छेदें सर्वांनी तरवार वोढिली. तेव्हां भाऊसाहेबीं आह्माकडे निरोप पाठविला कीं, तुह्मी हत्यार न लावणें, आमची व त्यांची तरवार लागली ह्मणजे तुह्मी सहस्त्रयोगें न विचारतां निघोन जावें. यांत अंतर कराल तर गोब्राह्मणवधाचे पातक कराल, जीवित्व अथवा मृत्यू आह्मास असो. असें शपतपूर्वक सांगोन पाठविलें. अबदलअल्लीपठाण (याणें) हत्यारें वोढून, एकसमयावच्छेदें आपले पीर मूर्छाचें स्मरण करून, घोडे चालविले. रायांनी तम तोफखाना व गाडदी यांसी ताकीद केली कीं, जेव्हा माऱ्यांत येतील तेव्हां तोफ सुरू करावी. यावर अबदलअल्ली समीप आले. त्यावेळेस इकडून दोन शिलका ह्मणजे दोन फैरा एका क्षणांत केल्या. माणसे व घोडीं कितेक उडालीं. त्याचा लेख कोणीहि केला नाहीं. त्यांनी दृढ निश्चय करून खंदकापावेतों आले. मागाहून घोडे वगैरे यांची घटणी फार जाहाली. कितेक स्वार खंदकांत प(डले) xxxxxxx (यापुढें किती पाने गेलीं आहेत तें न कळे) आहेत. राव व भाऊसाहेब यांणीं आपला पुण्यप्रताप, लौकिक करून वैकुंठवास केला. शोक किमपि न करावा. याउपरि जसे बेतेल तसें सेवेसी श्रुत करूं. विशेष, बहुत काय लिहू ? हे विज्ञापना. शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे, पौष शुध्द ८ अष्टमीचे दिवशी जालें वर्तमान लिहिले. हें विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries