मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

त्यांत हपशी व आंग्रे यांची लढाई शके १६५३ साली जाली. नंतर चिमणाजी बल्लाळ पेशवे राजपुरीवर गेले, तेव्हां सेखोजी आंग्रे हेही लष्कर घेऊन गेले होते. इकडे तानुद्दीन अल्लीखान याचा बेटा गाजीखान व उदेरीकर हपशी यांनी मुलखांत फार दंगा केला. ही बातमी आंग्रे यास लागताच पेशवे व आंग्रे तिकडून फौजसुध्दां चेंऊलास येऊन मोंगलांवर चढाई केली. उभयतांची लढाई होऊन आंग्रे यांनी जबर पोंचवून गाजीखान मोंगल यांस धरून कैद केला; आणि किल्ला राजकोट आंग्रे व पेशवे यांची दरोबस्त फोडून काढिला. मोंगल यास सोडून देऊन पोटास नेमणूक करून दिली. तेव्हांपासून या प्रांती पातशाही अंमल नाहींसा झाला. शके १६५५ साली आंग्य्रांचा अंमल चांगला झाला असतां सेखोजी आंग्रे मृत्यु पावले. नंतर त्यांचे बंधुंपैकी सुवर्णदुर्गास तुळाजी आंग्रे अंमल करू लागले. इकडे चौघे बंधू कुलाबा येथें राहिले. चौघे बंधूंत कलह माजला. तेव्हां मानाजी आंग्रे हे पळून रेवदंडेकर फिरंगी गोरे सोज कपतान यांच्या आश्रयानें येऊन राहिले. येथेंही फितूर करून किल्ला काबीज करावा असा मनसोबा केला. हा फिरंगी यास समजल्यावर मानाजी यास धरून कैद करावा असा बेत केला. इतक्यांत मानाजी हे पळून चेंऊल येथें आशाम नांवाची मशीद आहे त्यांत राहिले. इकडे फिरंगी यानें लष्कर घेऊन मानाजींवर चढाई केली. उभयतांचे लढाईत मानाजी आंग्रे यांचा मोड जाला. फिरंगी यानें मशीद घेतली. मानाजी हे ब्राह्मणगांवास गेले. तेथें पुन: मसलत करून लोक जमवून कुलाब्यास संभाजी आंग्रे यांजवर चढाई केली व संभाजीचा पराभव केला आणि किल्ला आपले ताब्यांत घेतला. संभाजी सुवर्णदुर्गास शके १६५७ साली पळून गेले. इकडे मानाजी आंग्रे यास राज्याभिषेक होऊन त्यांनी शके १६५७ पासून शके १६८० पर्यंत अम्मल केला. पुढें मानाजी, येसाजी व धोंडजी असे त्रिवर्ग बंधू कुलाब्यास असतां शके मजकुरी जंजिऱ्याहून हपशी शिद्दी सात व त्यांचा सरदार कोण नाईक परवारी आरमार फौजेसुध्दां रेवस बंदरी येऊन तेथून सागरगड किल्ला घेऊं लागले. परंतु शिद्दी सात फार झाल्यावर बचाव होणार नाही असें समजून, श्रीमंत पेशवे यांस पत्र लिहून मदत आणविली. तेव्हां कामारलें तर्फ श्रीगांव येथें उभयपक्षांची लढाई झाली. सात शिद्दी यांची फौज ११००० अकरा हजार होती. ती मारिली गेली. शिद्दी सात यास चिमणाजी बल्लाळ पेशवे यांनी सांगून पाठविलें की तुह्मी निघून जावें. परंतु तें तो कांही ऐकेना. तो ह्मणे की राज्य घेईन नाही तर मरून जाईन. असा त्यानें नेम केला होता. कोण नाईक परवारी होता तोहि मारला गेला. एकटा शिद्दी सात मात्र राहिला. त्यास सांगून पाठविलें, तरी तो ऐकेना. तेव्हा मानाजी आंग्रे हे फारच चांगले शिपाई होते, त्यांची व ह्याची लढाई होऊन, मानाजी यांणी शिद्दी सात याचें शीर उडविलें. हें यश घेऊन कुलाब्यास आले. नंतर मानाजी व एसाजी आंग्रे यांचा तंटा लागला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries