मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ १७ ]

श्री. शक १६४५ आश्विन वद्य ५.
चिरंजीव राजश्री आपा यांसि :-

पिलाजी जाधवराउ आशीर्वाद उपरि क्षेम, आश्विन वद्य ५ गुरुवासर मु॥ नजिक नजिक कावडे, प्रांत खेचिवाडा, यथास्थित असे. यानंतर : तुमच्या पत्रांची उत्तरें जासूदाबा। सविस्तर लेहून पाठविलें आहें, त्यावरून कळेल. तेथून दसरा जाहल्याउपरि कुच करून खेचीचे मुलखांत आलों. बोलीचालीचा निर्गम जाहाला. राजश्री सवाइजीकडील राजामल्ल आले. याचे भिडेनें दुपट्ट जाहाले. हात्ती व घोडे दोन नजर कबूल केलें. विक्रमाजितहि आजि भेटीस येणार. महादेवभट हिंगणे दिल्लीहून आला. पादशाही फर्मान, हात्ती व घोडे दोन जडाव घेऊन आले. वजिराचा मुनशी शिवनाथ आला आहे. पूर्वेकडे जावें; ऐसा मुद्दा त्याचा आहे, कांहीं मदत खर्च कबूल केल्यास. विचारें जाहलें, फाल्गुनमासीं जाणें होईल. येथील मनसबा जाहल्याउपरि अहिरवाड्यांत जाणें होईल. वोडसे, दतिया वगैरे अवघे वकील येथें जमा जाहाले आहेत. बोलीचाली अहिरवाडियांतच निर्गम होईल, तों कार्तिकमास लागेल. तुह्मीहि आळंदीचे यात्रा करून, मार्गशीर्ष शु॥ १ प्रतिपदेस स्वार होऊन, याल, तोंपर्यंत ये प्रांतीच आहों. पुढें जें वर्तमान होईल ते लिहून पाठवून. गणापा नाईक यास देवाज्ञा जाहली. बाबूजी नाईक यासी लि॥ आहे. त्याचें समाधान करून त्याची रवानगी श्रीस करणें. वरकड वर्तमान वरचेवरी लिहित जाऊन. इमारतीचें काम सांगून, येणें. त्याप्रमाणें करतील. उंट सुभानजीला तो अगोदर रवाना केले असतील, ते पावतील. हा आशीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries