मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

४७. तत्त्वज्ञानाचा अथवा तात्त्विक कल्पनांचा व प्रपंचाच्या अथवा मानवसमाजाच्या चरित्राचा संबंध बिंबप्रतिबिंबरूप आहे. जें तात्त्विक बिंब मनांत उत्पन्न झालें असेल त्याचें प्रतिबिंब समाजांत प्रतिफलित होतें. उदाहरणार्थ भरतखंडातील आर्यसमाज घ्या. (१) ऋक्संहितेंत भोग्य वस्तूंची प्राप्ति करून देणा-या व शत्रूंचा नाश करणा-या देवतांचे म्हणजे कल्पनांचें स्तवन केलेलें आहे. त्यावरून तत्कालीन समाजांत भोगप्राप्ति व शत्रुनाश हीं दोन तत्त्वज्ञानाची अंगे होतीं असें दिसतें; व ती कालांतरानें आर्यसमाजांत प्रतिफलित झालीं, असें इतिहास सांगतो. (२) बुद्धाच्या तत्त्वज्ञानांत भूतदया व निर्वाण हे दोन मुख्य सिद्धान्त आहेत. त्यांचे पर्यवसान संन्यास व दौर्बल्य या दोन रूपांनीं समाजांत प्रतिबिंबित झालें, दुष्टांवरहि दया करण्याचा जेथें निश्चय झाला व मरणोत्तर शून्यप्राप्ति होणार अशी जेथें खात्री झाली, तेथें शकयवनकिरातादि रानटी परंतु वुभुक्षु लोकांनीं ज्ञानसंपन्न संस्कृत लोकांवर राज्य करावें व संस्कृत लोकांनी निरिच्छ भिक्षु व श्रमण बनून समाजाच्या प्रपंचाचा चुथडा करावा, हें ओघासच येतें. (३) भगवद्रीतेंत बुद्धभिक्षुप्रमाणें कर्माचा न्यास करणें म्हणजे संन्यास नव्हे व क्लैव्याचा अवलंब करून रानटी शत्रूंचा पगडा बसवून घेणें म्हणजे भूतदया ऊर्फ शांति नव्हे, असा सिद्धात केलेला आहे. ह्या सिद्धान्ताचें प्रतिबिंब तत्कालीन आर्यसमाजावर पडून, शकयवनादि म्लेंच्छराजांना आर्यांनीं हाकून दिलें व शातवाहनादि हिंदूराज्यांची स्थापना भरतखंडांत झाली. बुशिडो धर्माप्रमाणें सध्याचे जपानी लोक अपमानाचें निर्यातन प्राण देऊन व घेऊन ज्याप्रमाणें करतात, त्याप्रमाणें चालुक्यांच्या वेळचे मराठे अपमानाचें निर्यातन प्राण देऊन व घेऊन करीत असत, असें शातवाहनाच्या सहाव्या शतकांत हिंदुस्थानांत प्रवास करणारा व्हानसंग लिहितो."If any one insult them, they will risk their lives to wipe out that insult,” (Bhandarkar’s Dekkhan). कृष्णानें अर्जुनाला सांगितलेलें तत्त्वज्ञान येथें बरेंच प्रतिबिंबित झालेलें उत्कृष्ट दृष्टीस पंडतें. ह्यालाच महाराष्ट्र धर्म म्हणतात. (४) हा महाराष्ट्रधर्म शातवाहनाच्या बाराव्या शतकाच्या अंतापर्यंत चालून, पुढें ज्ञानेश्वर आले. त्यांनी भावार्थदीपिकेतून इतर अनेक उत्कृष्ट तत्त्वांबरोबर खालील तत्त्व शिकविलें, व त्याचाच पगडा दुर्दैवानें किंवा सुदैवानें महाराष्ट्रांतील समाजावर उत्कटत्वानें बसला:---

उत्तमातें धरिजे । अधम तरि अव्हेरिजे।
हें कांहींच नेणिजे । वसुधा जेवीं।१॥

गाईची तृषा हरूं। कां व्याघ्रा विष होऊनि मारूं।
ऐसें नेणोंचि गा करूं। तोय जैसें।२ll 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries