मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

मौजे हिवरें, ता। कर्हेपटार, येथील पाटिलकी गायकवाड करीत असतां, त्यासी कुदळमाळी पाटीलकीबद्दल भांडो लागले. भगवंतपंत कुलकर्णी माळियास मिळाला. बापूजीपंतानीं नानास आणिलें. शेवटीं राजश्रीपावेतों गेले. तेथें माळियांनी शेखमिरी वशिला करून माळियाची पाटिलकी पहिली, गायकवाडचा भोगवटा, ऐसा करून दोठायीं पाटिलकी केली. माळियास निमेचीं राजपत्रें करून दिल्हीं. जोगोजी गायकवाड राजी होईना ह्मणून पुरंधरावर घातला. तेथून पळोन गेला. गायकवाड गांवांतून गेले. माळी पाटिलकी करूं लागले. माळियांत माळी भांडों लागले. तेव्हां चिमाजीअप्पापाशीं प्रसंग पडला. त्याणीं साठाईं पाटिलकी केली. साजणांनी सामुठी पीठ आणून देविलीं. भाकर करून पोळी होळीस बांधावी, साजणांनी सामुठी माती आणून शिराळशेट देवळीं करावा, सिरपाव साठाईं वांटून घ्यावा, ऐसें करून दिल्हें. माळी साजागाचे मिळून पाटिलकी साधिली, ह्मणून साठायीं केली असे. कागद दिवाणचा करून दिल्हा असे. याजवर अलीकडे राजश्री पेशव्यांनी गायकवाडास कौल देऊन गांवावर यावयास सांगितले. ते आले. घरांत राहून शेतें वाहू लागले. गतवरसीं माळियांची पोळी गायकवाडांनीं लागूं दिल्ही नाहीं. सिरपाव खंडणीचा घेऊं दिल्हा नाहीं. त्याजवर बायाजी माळी लष्करांतून आलियावर मिरजेच्या मुक्कामी वैशाख व जेष्ठमासीं जाऊन, जोगोजी गायकवाड यास, दीडसे रुपये मसाला आणिला. नानास व जमीदारांस पत्र बाळाजी बाजीरायांपासून आणिलें कीं, गाळियाचे मानपान सुरळीत चालों देणें, गायकवाड मानपान सुरळीत घेतला तर घेऊं देणें, नाहीं तर निमे पाटिलकी त्यांची अमानत राखणें. ऐसीं आलीं. जोगोजी गायकवाड यास घेऊन, हुजुर येऊन, गडाहून पळालियाची व पाटिलकीसमंधें गुन्हेगारी हजार रुपये खंडून, राजश्रीकडून पागोटें बांधून, बापूजीपंताकडे पाठविला. हजारांत दीडसे रुपये मसाला अजुरा दिल्हा. साडेआठशें बापूजीपंतास वसूल घ्यावयाविशयीं लिहिलें. निमे ऐवज राजश्रीचा, निमे ऐवज जिल्हेचा. माळियाची व गायकवाडाची येवळेस दरबारी रुबरु जाली नाही. मागून माळी दरबारीहून आले. त्यांनी बाळाजी बाजीरायांपासून जमीदाराच्या नांवें पत्र आणिलें कीं, माळियाचा गा।चा इनसाफ पेशजी हुजूर जाला. गा। खोटें झाले. माळी खरे. परंतु गा।चा भोगवटा बहुतां दिवसांचा. याजकरितां निमेनीम करून माळियास पत्रें करून दिल्हीं. गुन्हेगारीबद्दल जोगोजी गा। पुरंधरीं ठेविला होता, तो पळाला. त्याची वतनामुळें गुन्हेगारी खंडून पाठविला असे. माळी निमे मोकदमीचे मानपान घेऊन पाटिलकी करितील त्यास करूं देणें. गा। निमे करितील तर करूं देणें. गा। न करीत तर त्याचें निमें वतन अमानत असे. ऐसें पत्र आणिलें असे. त्याची नकल देशपांडियांनी घेतली असे. याचप्रों। रा। बापूजीपंतास पत्र असे. इतकें केलें सखाराम भगवंत बोकील हिवरेंकर यानें. राजश्री बाळाजी बाजीराऊ याजपाशीं आहेत. राजश्री महादाजी अंबाजी पुरंदरे यांस अगत्य बोकलाचें. बोकलास अगत्य माळियाचें. याजबद्दल गा।स हैराण केलें. गा। मालजामीन आणीत तोंपर्यंत हजीरजामीन सिदोजी पा। जा। वानवडकर आठा दिवसांचा हजीरजामीन बापूजीपंती घेतला असे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries