भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

गंगानामक कुमारीशी शंतनु राजाने समागम केल्याचे वृत्त सर्वप्रसिद्ध आहे. तात्पर्य, ज्याला आपण कन्यादूषण म्हणून म्हणतो ते प्राचीन आर्यलोकात सनातन धर्म म्हणून होते, व त्याचा प्रघात कौरवपांडवांच्या काळीहीं होता. हा प्रघात पाणिनीच्या काळीही तुरळक होता. कुमारः श्रमणादिभिः २-१-७०. या सूत्रात कुमारकुलटा, कुमारगर्भिणी व कुमारबंधकी हे तीन सत्पुरुष समास पाणिनी देतो. श्रमणादिगणात कुलटा हा शब्द तिसरा आहे. कुमारकुलटा म्हणजे कुमारी चासौ कुलटा च. कुमारी असून जी कुलटा म्हणजे छिनाल ती कुमारकुलटा. कोंवारपणी जी गर्भार राहिली ती कुमारगर्भिणी व कोंवारपणी जी वांडकी निघाली ती कुमारबंधकी. याचा अर्थ असा की पाणिनीकाली कुमारी व्यभिचारिणी वांडक्या व गर्भार असलेल्या आढळत असत. कौमारापूर्ववचने ४-२-१३ या सूत्रात कौमारः पतिः व कौमारी भार्या असे दोन प्रयोग पाणिनी देतो. पुंसा सह यस्याः असंप्रयोगः सा कुमारी ६-२-९५ असा कुमारी शब्दाचा सांप्रदायिक अर्थ आहे. जिला पूर्वी पुरुष माहीत नाही अशा मुलीच्या नव-याला पाणिनीकाली कौमारः पतिः म्हणून म्हणत व त्या मुलीला विवाहानंतर कौमारी भार्या म्हणत. ह्यापासून गर्भित अर्थ असा निघतो की पाणिनीकाली ज्याप्रमाणे विवाहापूर्वी पुरुष माहीत नसलेल्या मुली असत त्याचप्रमाणे पुरुष माहीत असलेल्याही मुली आढळत. नाहीतर कौमारः पतिः व कौमारी भार्या यांचे विशेष कौतुक पाणिनीकाली झाले नसते. ह्या सर्व विवेचनाचा मथितार्थ असा की, अतिप्राचीन आर्ष काळापासून पाणिनीकालापर्यंत अविवाहित मुलीशी समागम करण्याची रूढी भारतीय समाजात प्रथम अनिंद्य व धर्म्य म्हणून व पुढे पुढे निंद्य म्हणून प्रचलित होती. मागे चौथ्या कलमात सांगितलेच आहे की अतिप्राचीन आर्षकाळी मुलींवर सहा वर्षांपर्यंत देवांचा हक्क असे. नंतर त्यांच्यावर मनुष्यांचा हक्क उत्पन्न होई. याचकरिता आठव्या वर्षी मुलीचा विवाह करावा अशी रूढी भारतीय समाजात असलेली दिसते. आठ वर्षांपासून मुली पुरुषाला उपभोग्य होत असा सामाजिक अभिप्राय होता. चोवीस वर्षांच्या मुलाने आठ वर्षांच्या मुलीशी विवाह करावा, अशा अर्थाच्या स्मृति प्रसिद्ध आहेत. विवाहरात्रौ समागम करावा अशीही स्मृतिवचने आहेत. तेव्हा, आठ वर्षांच्या मुली समागमेय समजण्याची रूढी देशात होती यात संशय नाही. पुरुषसमागम आधी यद्यपि झाला व त्या समागमापासून अपत्यही यद्यपि झाले, तत्रापि पुढे धर्म्य विवाह होण्याला मुलींना कोणतीच आडकाठी नसे. अशी ही कन्यादूषणाची चाल आर्ष समाजात होती. पृथ्वीवरील इतर त्याच योग्यतेच्या समाजात ही चाल आढळून येते. At Noukatriva, the young girls of the island are the wives of all those who can buy their favors. When they are older, they form more lasting connections. In the same archipelago the French sailors were frequently offered girls of eight years and they were not virgins (Letourneau).

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries