भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

ही तडजोड करण्याला वधूचा भाऊ होता. म्हणून प्रसंगी तो धावून आला. ज्या वधूला भाऊ नसेल तिचे हाल कुत्र्यानेही खाल्ले नसतील. सबब अभ्रातृक मुलीची किंमत विवाहकर्मात अत्यंत निकृष्ट किंवा शून्य मानलेली आहे व तसला पाठिंबा नसलेली मुलगी वधू करू नये असा निषेध केला आहे. शिळेवर वधू घट्ट उभी राहिली. नंतर देवांना द्यावयाचे धान्य भावाने आणिले आणि ते वधूच्या हाताने देवास अर्पण करविले. वध्वंजलौ उपस्तीर्यं भ्राता भ्रातृस्थानो वा द्विर्लाजान् आवपति १-७-८. वधूच्या ओंजळीला तूप लावून तिच्या भावाने किंवा भावासारख्याने त्या अंजलीत दोन वेळ लाह्या घातल्या. ( पंचप्रवरी असेल तर तीन वेळ लाह्या घालाव्या १-७-९). नंतर लाह्यांच्या अवदानावर तूप घातले १-७-१०/११. ते अवदान अग्निद्वारे अर्यमन् वरुण व पूषन् या देवांच्या पदरात टाकले, आणि अवदान देताना देवांना खालीलप्रमाणे बजावले. अर्यमणं नु देवं कन्या अग्निं अयक्षत, स इमा देवो अर्यमा प्र इतः मुंचातु न अमुतः स्वाहा १-७-१३. अग्नीच्या द्वारा कन्या अर्यमन् देवाला हे अवदान देत आहे, सबब येथून नव-यापासून अर्यमन् देवाने हिला सोडवून नेऊ नये, तेथून आपल्या ताब्यातून सोडून द्यावी, हीच बजवणूक पूषन् व वरुण या देवांची भावाने केली. भाऊ साधाभोळा नव्हता, हडसून खडसून व्यवहार करणारा होता. त्याने एकदम सा-या लाह्या किंवा सर्व अवदान तिन्ही देवांपुढे एकदम ओतले नाही. प्रत्येक देवाला एकेकटा बोलावून ज्याचे अवदान त्याच्या पदरात अग्नीला साक्ष ठेवून घातले. ओप्य ओप्य ह एके लाजान् परिणयंति तथा उत्तमे आहुती ने सन्निपततः १-७-१५. एकदम सारी अवदाने देण्यात गडबड व गोंधळ होतो, कोणाचे कोणते अवदान ते समजत नाही, सबब प्रत्येक अवदानानंतर अग्नीला प्रदक्षिणा घालून भावाने प्रत्येक देवाच्या माथी त्याचे त्याचे अवदान बिनचूक मारले. भावाच्या साहाय्याने वधूची देवांच्या देण्यातून यद्यपि सुटका झाली, तथापि अद्याप वधूच्या केसांना वरुणाने जखडून बांधलेला लोकरीचा दोर ऊर्फ पाश वधूला पीडा करीतच होता. त्या पाशातून गरीब बिचा-या वधूचे केश वराने हलकेहलके सोडविले व खालील धन्योद्गार काढिले.
प्र त्वा मुंचामि वरुणस्य पाशात् १-७-१७।१८.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries