भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

महस्पुत्रासो असुरस्य वीरा । दिवो धर्तार उर्विया परि ख्यन ।।

त्यावर यमी म्हणाली, देव रागावणार तर नाहीतच, उलटे त्यांना आपले हे कृत्य पसंत पडेल.
उशंति द्या ते अमृतास एतद् ।

यम व यमी यांच्या ह्या संवादावरून उघड होत आहे की, फार पुरातनकाळी बहीण-भावंडांचा समागम रानटी आर्य लोकांत प्रचलित होता, व ऋग्वेदकाळी तो गर्ह्य समजला जाऊ लागला होता. बहीण-भावंडांच्या समागमाचे उत्तम उदाहरण महाभारताच्या प्रारंभालाच दिलेले आढळते. अदिति ही दक्षाची कन्या व तीच अदिति दक्षाची आई असे विधान दहाव्या अष्टकातील ७२ व्या अध्यायाच्या चौथ्या वर्गात केलेले आढळते. सरमिसळ समागमाचे हे नामी उदाहरण आहे. य इं चकार न सो अस्य वेद, स मातुर्योनौ परिवीतः । हे विधान पहिल्या मंडळाच्या २२व्या अनुवाकाच्या १६४ व्या सूक्तातील ३२ व्या ऋचेत आले आहे. बापाला आपला मुलगा कोणता ते माहीत नाही, आईच्या पोटी तो उत्पन्न झाला एंवढे मात्र खरे, असा या ऋचेचा गर्भितार्थ आहे. हेही सरमिसळ समागमाचेच उदाहरण आहे. "यस्त्वा भ्राता पतिर्भूत्वा जारो भूत्वा विपत्यते, प्रचां यस्ते जिघांसति तमितो नाशयामसि (१०-१६२-५)" या वाक्यात गर्भार स्त्रीशी भाऊ, धनी किंवा जार यापैकी कोणी समागम करील त्याचे पारिपत्य करू म्हणून दहशत घातलेली आहे. हेही सरमिसळ समागमाचेच उदाहरण आहे. स्त्री गर्भार नसली तर भावाने, धन्याने किंवा जाराने तिशी समागम केला तरी चालेल असा ध्वनी या दहशतीतून निघतो. अशी आणिक किती तरी वाक्ये ऋग्वेदातून काढून दाखविता येतील. सध्या इतकीच देऊन प्रकृताचे अनुसरण करतो. तात्पर्य, महाभारत व ऋग्वेदात सरमिसळ समागमाचे दाखले आढळतात व त्यावरून बिनधोक असे विधान करता येते की, अतिप्राचीन आर्य समाजात एकेकाळी स्त्रीपुरुष समागम अत्यंत अनियंत्रित असे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries