भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

आयांवरून मुलांना व्यावर्तक नाव ठेवण्याची आवश्यकता ज्या काली भासू लागली त्या काली मूळच्या सरमिसळ समाजात एक क्रांती घडून आली. सर्व मुले यूथातील सर्व स्त्रियांची सामायिक समजण्याची चाल मागे पडून अमुक मूल अमुक स्त्रीचे असे वैशिष्ट्यीकरण सुरू झाले, सामायिक मातृत्व जाऊन वैयक्तिक मातृत्व उदयास आले. मायिक यूथात ऊर्फ कळपात अपत्यांच्या माता ज्या स्त्रिया त्यांच्या करवी प्रथम अस्पष्ट विभाजन प्रचलित झाले. आई व तिची अपत्ये हे अस्पष्ट कुटुंब झाले. यूथातील प्रजननक्षम अशा सर्व स्त्रियांची अशी अस्पष्ट कुटुंबे झाली. अद्याप ही सर्व कुटुंबे पृथक् पृथक् विभक्त होऊन एकापासून दूर राहूं लागली नव्हती. सर्व कुटुंबे यूथातच असत. स्त्रियांशी समागम यूथातील वाटेल तो पुरुष करीतच असे. पुढे स्त्रिया-स्त्रियांत आपापल्या अपत्यांच्या जोपासनेसंबंधाने व इतर अशा मायेच्या कारणांनी बेबनाव वाढून स्त्रिया आपापल्या मुलांबाळांसह स्वतंत्र झोपडी करून स्वतंत्र संसार थाटू लागल्या. तथापि यूथातील वाटेल त्या पुरुषांशी स्वतंत्र कुटुंबातील स्त्रियांचा संबंध चालूच असे. पुरुषांनी मृगया करावी. रानावनातून श्वापदे मारून आणावी व ती कुटुंबस्थापक स्त्रियांच्या हवाली करून स्त्रिया तयार करतील ते अन्न खाऊन खुशाल असावे असा मनू सुरू झाला. ह्या स्वतंत्र कुटुंबे स्थापन करणा-या स्त्रिया प्रथम प्रथम एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या सोदर बहिणी बहिणी असत. सामायिक यूथसंस्था फोडून विभक्त कुटुंबसंस्था जी प्रथम उदयास आली ती यूथातील सोदर बहिणींच्या हस्ते उदयास आली या विधानाला पोषक असे प्रमाण भारत व हरिवंश यातील संभवपर्वात ठळक असे सापडते. दक्षाला ज्या साठ कन्या झाल्या (हरिवंश अध्याय ३) त्यापैकी दहा कन्या त्याने धर्म ऋषीला दिल्या, तेरा कश्यपाला दिल्या, सत्तावीस सोमाला दिल्या, चार अरिष्टनेमीला दिल्या, आणि दोन दोन भृगु, आंगिरस आणि कृशाश्व यांना प्रत्येकी दिल्या.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries