भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

५. (१) पाशवावस्थेत वानरांतील एकपतिक सर्व भार्याक समाज, (२) मानवावस्थेतील बहुपतिक बहुभार्याक सरमिसळ करणारा समाज, (३) नंतर बहुस्वसृभार्याक बहुभातृपतिक समाज, (४) नंतर बहुस्वसृभार्याक एकभ्रातृपतिक समाज आणि एकभार्याक बहुभ्रातृपतिक समाज, (५) आणि शेवटी बहुभार्याक एकपतिक समाज ऊर्फ प्रजापतिसंस्था. अशा परंपरेने प्राचीन आर्यसमाज ज्या काळी परिणत झाला त्या काळापासून व्यासांनी आपल्या भारतेतिहासाचा प्रारंभ केला आहे. मरीचि, प्रजापति, अत्रिप्रजापति, अंगिरस प्रजापति, पुलस्त्य प्रजापति, ऋतुप्रजापति, वसिष्ठप्रजापति, कर्दमप्रजापति, धर्मप्रजापति, वीर प्रजापति, अरण्यप्रजापति, प्राचीन बहिप्रजापति, दक्षप्रजापति, अंगप्रजापति, क्रचिप्रजापति, सूर्यप्रजापति, मनुप्रजापति इत्यादी अनेक प्रजापतींची नावे भारतात व हरिवंशात दिलेली आहेत. आर्य लोकांत पितृप्रधान कुटुंबसंस्था म्हणजे पित्याच्या नावावरून पुत्राचे नाव ज्या कुटुंबसंस्थेत पडते ती संस्था प्रथम जेव्हा सुरू झाली तेव्हाच्या प्रसिद्ध कुटुंबसंस्थापक ऊर्फ कुलसंस्थापक कुलपतींची ऊर्फ प्रजापतींची ही नावे आहेत. या प्रजापतिक कुटुंबसंस्थेत सर्व स्त्रिया एका प्रजापतीच्या भार्या असल्यामुळे, समाजात इतर नर जे वयात येत त्यांना तीन मार्ग खुले असत. एक मार्ग म्हटला म्हणजे मूळ कुटुंबातून काही प्रिय स्त्रिया काढून नेऊन निराळे स्वतंत्र कुटुंब स्थापून स्वतः प्रजापती व्हावयाचे. दुसरा मार्ग म्हटला म्हणजे आजन्म अविवाहित राहावयाचे, व प्रजापतीच्या कुटुंबात भारभूत रिकामटेकडे न राहता अरण्यवास पतकरावयाचा. तिसरा मार्ग म्हटला म्हणजे प्रजापती कुटुंबाला सोडून देऊन दूरदेशी तत्प्रांतीय सरमिसळ समागम करणा-या मागसलेल्या रानटी समाजातील स्त्रियांशी प्रजापती नात्याने राहून पृथ्वीभर वसाहती करावयाच्या. या तिन्ही मार्गांची वर्णने भारतेतिहासात आली आहेत. मूळ प्रजापतिक कुटुंबाच्या शेजारी स्वदेशातल्या स्वदेशात निराळीं विभक्त प्रजापतिक कुटुंबे स्थापिली जाऊन आर्यसमाज बहुसंख्य होऊन आर्यप्रजावृद्धी कशी झाली याचा तपशील प्रस्तुत स्थळीं देण्याचे कारण नाही. असा प्रकार झाला नसता तर ऋषीनी कुटुंबे व पुढे प्रजा जी इतकी बहुसंख्य झाली, ती झालेली न दिसती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries