भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

अग्नीच्या साह्याने हिंस्त्र पशू व दुष्ट शत्रू यांचा प्रतिकार करता येऊ लागला, अग्नीच्या योगाने दाट जंगलाची चरती कुरणे करता आली, सबब अग्नी ह्या अजब वे अतर्क्य वस्तूवर आर्यपूर्वजांचे निरतिशय प्रेम ऊर्फ भक्ती बसली आणि अग्नी हा सुखकर्ता, दुःखहर्ता व विघ्ननिवारिता असा भासू लागला. अग्नी या सर्वतोपरी अत्यंत उपयुक्त वस्तूवर आर्यपूर्वजांची इतकी भक्ती बसली की खाणे, खेळणे, बसणे, उठणे, निजणे व प्रजोत्पादन करणे ते सर्व अग्नीच्या साक्षीने ते करू लागले. हे शेवटले व अत्यंत महत्त्वाचे जे प्रजोपादनाचे कर्म ते अग्निकुंडाभोवताली उबा-याच्या भूमीवर आर्यपूर्वज उरकीत, हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण, यज्ञ म्हणून जी संस्था आर्यपूर्वजांत पुढे उदयास आली तिचा उगम अग्नीकुंडाभोवती प्रजोत्पादनाचे जे कार्य चाले त्याच्याशी संबद्ध आहे. अग्नीपाशी ऋषिपूर्वज वारंवार आग्रहाने काय मागतात ते ऋग्वेदाच्या पाचव्या व सहाव्या मंडळातील चाळता चाळता सहज आढळणा-या काही वाक्यांचे अवतरण करून दाखवितो.
(१) स्यान्नः सू नु स्तनयो विजावा
(२) शग्धि वाजस्य सुभग प्रजावतः
(३) अयं अग्निः सुवीर्य स्येशे
(४) अग्ने तोकं तनयं वाजि नो दाः
(५) गो माँ अग्ने S विमाँ अश्वी यज्ञो
नृवत्सखा सदमिदप्रमृष्यः
इळावाँ इषो असुर प्रजावान् ।
दीर्घो रयिः पृथुबुघ्नः सभावान् ॥
(६) त्वदेति द्रबिणं वीरपेशाः ।

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries