मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १००.

१६९७ आश्विन वद्य ३.

राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यासि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ येथील सारी माहितगारी तुह्मांस आहेच. सारांश फत्तेसिंगास आश्रय जबरदस्ताचा सांपडला, सबब ऐवज हातास येत नाहीं व शेवाहि नाहीं. गोविंदराव तरी जातीनें वोढक व कोणाचे आश्रयानेंहि छंद करितो ऐसें दिसोन येतें याचे तपसील पत्री कशास ल्याहावें ? तुह्मी माहीतच आहा. असो ! बहुत लेहून फल काय ? खुलासा मजकूर :-

येथील इंग्रेज आमचे हुकुमांत असिल्यास उभयतां गायकवाड आज्ञेंत वर्ततील व ऐवजहि मिळेल. पुढील मसलतेस उपयोगी पडेल. थोरले मसलतीस इंग्रेज सामान तूर्त बंद आहे. परंतु गुजरातचे बंदोबस्तास तरी उपयोगी असावें. उफराटा फत्तेसिंगास आश्रय त्याचा. मग फत्तेसिंगानें कां न ओढावे ? गोविंदराव आपला. त्यास मात्र दाबल्यानें लोक हंसतील. उत्तम पक्ष, फत्तेसिंगासच दाबावें. निदानी दोघांसहि दाबून सरकारकाम करावें. सांप्रत कांहीच होत नाहीं. सबब आह्मी रेवातीरास आलो. पुढे काय मसलत करावी ते लिहिणें. जसें जनराल कोशल सांगतील तसे केलें जाईल. तूर्त च्यार दिवस रेवातीरी पाणी पिऊन स्वस्थ आहो. परंतु फौजेस व पाईदळास पोटाचें संकट पडलें आहे. देशची राजकारणें बहुत लागली होती व सांप्रतही आहेत. परंतु बंगाली खबरा ऐकोन कांही दबली; कांहीं आहेतच. तुह्मास कळावे. इकडील मजकूर सविस्तर राजश्री रामचंद्र विठ्ठल यास आज्ञा केली आहे, त्याचे लिहिल्यावरून कळेल. तें समजोन त्याप्रे॥ बंदोबस्त करणें. जाणिजे. छ १५ शाबान बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries