मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १२१.

१६९७ मार्गशीर्ष.

राजश्री लक्ष्मणपंत अण्णा स्वामीचे सेवेसी :-
विनंती उपरी. इकडील वर्तमान श्रीमंतांचे पत्रावरून अवगत होईल. अमीनखान याची रवानगी अमदाबादेस तुह्मी येथें असतांच झाली होती. त्याउपरी जनरालाचें पत्र लडाई मौकूफ करावयाविसीं आलें. मशारनिलेस पाठविले ते फिरोन आणावयाचा पेंच युक्तीनें करणें तें जालें पाहिजे. याजकरितां आपाजी गणेश यांजकडून राजकारण हुजूर गेलें होतेंच. तेव्हां पांच लाख रुपये त्याजपासून घेऊन त्याजकडे अंमल सांगावा. याप्रमाणें करोन अमीनखानास समजोन सांगावें व आपाजी गणेश याजकडून ऐवज घ्यावा यास्तव राजश्री सदाशिवपंत श्रीमंतांनी अमदाबादेस पाठविलें. आपाजीपंतांकडून कराराप्रमाणें ऐवज न आला व अमीनखानाची सिबंदी फार चढली ती वारल्याखेरीज उठणें होत नाहीं, ऐसें दिसोन आलें. व अमीनखानाकडून लडाई मौकूफ करविली असतां, एक दिवशीं शहरांतून त्यांनीं याचे मोरच्यावर घालविलें. त्यास, इत्यादिक पेच पाहून, अमीनखानाकडे मामलत सांगितली. ऐशास आपाजी गणेशाकडून कारकून सदाशिवपंताकडे बोलावयास आले होते, त्यांस अमीनखानानें कैद केलें. बदराहाची गोष्ट बोलावयास आले त्यांस धरणें युक्त नव्हे. त्याणीं तो त्यांच्या लबाड्या समजोन केलें असेल. परंतु सरकारचे आज्ञेशिवाय केलें तें कार्याचें नव्हे. परंतु उपाय काय ? दक्षणेकडे निघावयाचें केलें. याजकरितां उपेक्षा करणें प्राप्त जाली. इंग्रेजाकडून दोन तोफा खांबाइताहून खान मशार्निलेकडे देविल्या होत्या त्या माघाऱ्या देविल्याच आहेत; परंतु अमीनखान देतीलसें वाटत नाहीं. याजकरितां येविसींची सूचना जनरालास करावी. श्रीमंतांनी सविस्तर मजकूर तुम्हांस कळावे, याजकरितां लिहिले आहेत ते समजोन, युक्तायुक्त ध्यानांत आणून तेथील मर्जी पाहून, व श्रीमंत सोनगडेचे सुमारें जातात, लडाई सुरूच होईल हें समजोन, जें बोलावयास युक्त तें बोलावें. केवळ पंचाईतीवर येऊन पडे तें करावें. याजखेरीज आह्मांस आश्रय नाहीं. घासल्यांनीं परिणाम काय हें आपणांस कळतच आहे. तेथें विस्तार काय ल्याहावा ?

राजश्री गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल याजकडे सिनोर द्यावें ह्मणून जनरालानीं यास लिहिलें आहे, ह्मणून आपण श्रीमंतांचे पत्रीं लिहिलें, परंतु कारनेलीनें मजकूर येथें बोलिले नाहींत. वांत्तणीही देत नाहीं. ऐवज येत नाहीं. हा पेंच ! याजकरितां सोनगड-भोडगांवपावेतों जावयाचा विचार केला आहे. च्यार रुपये तिकडे तरी मेळवून फौजेस द्यावे लागतील. इंग्रेजास चिखलीपर्यंत जाणेंच होतें. सोनगडापर्यंत जावयाची परवानगीही याणीं आणिली आहे. भोडगावापर्यंत गेलियानें सरकारची सोय, ह्मणून यासी बोलतो. हेही युक्तीनें परवानगींपाणी लागतें याप्रों लेहून आणितो ह्मणतात. परंतु हें अंतर्यामचें बोलणें. याचें जनरालास कळूं न देतां पर्यायेंकरून पाण्याचें निमित्य सांगून त्याची परवानगी भोडगांवापासीं रहावयाची आलियास उत्तम आहे. घाटतोडींच भोडगांव. गेलियानें फितुरी चढोन येतील. तेव्हां हें झुंजतील. अंगावर आलियास जुंजावें, ऐसी यास परवानगी आहेच. कजिया लागला ह्मणजे जनराला समागून साहित्य पुरविणेंच लागे. परवानगीही इतकियांत येतच आहे.त्याचेंही मानस तुह्मीं लिहिलें होतें कीं त्याजकडून कजिया लागलियास मग हे लडतील, निमित्य पाहता. याप्रों आहे. त्यास तुमचे सलेस येईल तें करावें. हे दिवस लढाई सुरू व्हावयाचे आहेत. या दिवसांत पंचाईत न पडतां होईल तें करावें. कारनेलीची सरकारची पंचाइती पडली, ह्मणजे कामाचे वख्त विरुद्ध पडेल. सारे धारवट पहावे, लिहिणें तें तुह्मांस सर्व समजावें, या अर्थें श्रीमंत लिहितात. परंतु तुह्मी तेथील भावमर्जी पाडून कराल हे निशा आहे. कळावें. मजलाही श्रीमंतांची आज्ञा होती त्यावरून लिहितों. कळावें. रा॥ राघोपंत सुखरूप आहेत. चिंता न करावी. बहुत काय लिहिणें ? लोभ असावा हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries