मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

१ हरीपंतनाना विभक्त जाल्यानंतर त्याणी कृत्यें केलीं
          १ चिरंजीव सौ सालीबाईचे लग्न वैशाख शके १७३८ धोंड दीक्षित वोक यांचे पुत्रास दिल्ही. लग्नांत हरीपंत भोपळे याचा कज्या मोठा जाला.
          १ श्रीमाहायात्रेस पुण्याहून निघोन सडे गेले मिति कार्तिकि शु।। ७ गुरुवार शके १७४४. कुटुंब व चिरंजीव बापू यांस पुणे मुक्कामीं ठेऊन गेले.
             तिरस्थळी यात्रा करून देशी घरीं आले मिति माघ वा। १ शके १७४५.
          १ पुढील थोरले चौकांत नवीन विहीर पाडावयास प्रारंभ केला मिति फालगून शु।। ११ शके १७४५. विहीर पाडल्यामुळें चौकाचा आव गेला.
             पाणी बारा हातावर लागलें.

१ गोविंदराव यांस पोटदुखीचा माहायात्रेस गेल्यापासून उपद्रव जाला. तेव्हांपासून औषधी उपाय बहुत केले परंतु गुणास आलें नाहीं सबब श्रावण वा। ११ शके १७४५ चे मित्तीस लक्ष्मणगीर सोट्याचे म्हसोबापाशी राहात होता त्यास आणून प्रकृतीची भावना सांगितली त्याणें तीन दिवसांत प्रकृती चांगली करून देतों या प्रों करार केला त्यावरून गोसावी मजकूर याणें उतारा करून मंत्रसामर्थ्ये करून पाण्यांत आंगारा दिल्हा त्याणे ढाळ मनस्वी जाहाले त्यामुळें प्रकृत ग्लान फार जाहाली स्मृती हि राहिली नाहीं. तदनंतर गोसावीमा। यास पुन्हा आणोन बहुत प्रकारें सामदानभेदेंकरून सांगून पुन्हा प्रकृत पूर्ववत् होती तशी तरी करून देणें याप्रमाणें सांगून भाद्रपद शु।। ५ शके मारीं पुन्हां उपचार ढाळ न होतां करणें म्हणोन बहुत प्रकारें सांगितलें असतां विडा करून मंत्र घालून दिल्हा त्याणें ढाळ जे झाले तें लिहितां पुर्वत नाहीं. या कृत्यास पांच पंचवीस रु।। खर्च हि केला. तेव्हांपासून शरीरीं नाना प्रकारच्या व्याधी नवीन उत्पन्न जाल्या ते दिवसापासून मांत्रीक उपाय हि बहुत केले व औषधी उपाय हि नानाप्रकारचे करीत आहों परंतु गुणस अद्यापपर्यंत आलें नाहीं भ्रांत पडली आहे.

१ गोविंदराव तात्या यांचे शरीरीं अकस्मात् श्रीरामेश्वर देवाचे दर्शनास गेले तेथें घेरी येऊन झोक जाऊन पडले आणि जिव्हास्तंभ वायू जाहाला मिति वैशाख शु।। ८ गुरुवार शके १७४६. तेव्हांपासून औषधी उपाय हि बहुत केले व देवऋषी हि बहुत पाहिले परंतु अद्यापवत् प्रकृती आहे तशी च आहे.

१ गोविंदरावतात्या यांची स्त्री सौ रमाबाई याणीं देवास नवस केले जे पुत्र आल्यावर देवदर्शनास घेऊन येऊ म्हणोन नवस केला होता; सबब नवस फेडावयास चिरंजीव निळकंठराव सौ सूनबाई व सौ रमाबाई यांस देवदर्शनास पाठविली मिति माघ शु। ७ बुधवार शके १७४६.-
              १ श्री योगेश्वरी जोगाईंचे आंबें
              १ श्रीतुळजापूर देवी
              १ श्रीपंढरपूर
              १ श्रीरवळनाथदेवास
              १ श्रीमाहालक्ष्मी कोल्हापूर
              १ श्रीखंडोबा जेजुरीचा
           -----
             ६

सदरहू साहा देवांस नवस केला होता त्याप्रो यात्रा करून घरीं सुखरूप येऊन पोहोचलीं मिति चैत्र शु।। १० मंगळवार शके १७४७.

१ नीलकंठराव याजवर बंडाचा आरोप आला होता मिति माघ वा। १० शके १७६० त्याची चौकशी बेलसाहेब बाहादूर याणी करून कांही शाबूद नाहीं म्हणोन सोडून दिल्हें मिति अधिकज्येष्ठ वद्य १४ सोमवार शके १७६१.

१ साठीशांती ज्येष्ठ वा। ६ शके १७६२ या रोजी केली रोज शनिवार.

१ गोविंदराव तात्या यांची प्रकृत बहुत बिघडली म्हणोन श्रीकृष्णातीरीं क्षेत्र माहुली येथे जाऊन चार दिवस राहून नंतर मार्गशीर्ष वा। ३० शके १७६७ विश्वावसु नामसंवत्सरे त्या रोजास समाधिस्थ जाले, चतुर्थाश्रम घेऊन जाले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries