मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ खमसैन मया व अल्लफ, सन ११५९ फसली,
अव्वल साल छ १९ जबादिलाखर, २५ मे
१७४९, ज्येष्ठ वद्य ५ शके १६७१.

छ ९ साबान रोजीं (१३ जुलै १७४९) स्वारी पेशवे यांची सासवडास गेली ती रमजानांत (आगष्ट १७४९) परत आली. साता-यास शाहू महाराजांची प्रकृति फार बिघडली. तेव्हां जवळ मंडळी होती त्यांनी मसलत केली की, राजानें दत्तक पुत्र घ्यावा. परंतु शाहू महाराज यांची प्रकृति अलीकडे कांही दिवस भ्रांतासारिखी झाली होती. त्यापूर्वी प्रकृति साफ असतां राजाचे दोन पुत्र दोन तीन वर्षांचे होऊन वारले. वृध्दापकाळ सबब तेच वेळेस असा विचार ठरला कीं, कोल्हापुरास संभाजीस पुत्र झाला तर तो मी दत्तक घेईन. संभाजीस संततीच झाली नाहीं. तेव्हां मालोजीचा बंधू, शाहाजीचा चुलता, विठोजी होता, त्याचा वंशज घ्यावा, तर त्याचाही शोध लागेना. तेव्हां शाहू महाराज यांनी महादाजी अंबाजी पुरंदरे, गोविंदराव चिटणीस यांस सांगितलें कीं ताराबाई साता-यास आहे. तिनें आपला नातू, शिवाजीचा पुत्र, शिवाजीचे मरणानंतर जन्मला, त्यास ताराबाईनें कोठें लपवून ठेविला आहे त्याचा शोध आणावा. मग ताराबाईस विचारितां त्यांनीं सांगितलें कीं, शिवाजी मेला, तेव्हां त्याची बायको भवानीबाई गरोदर होती, तिला पुत्र झाला, तो रामराजाच्या भीतीस्तव त्या मुलास पन्हाळ्यावरून काढून गुप्तपणें त्याचे मावशीचे घरी ठेविलें, तिने बारशीस नेला, तो अप्रसिध्दपणें तेथें आहे, असें सांगितलें. हें वर्तमान सकवारबाईस कळतांच ताराबाईचा नातू निघाला तो खोटा आहे अशी मसलत केली. यास प्रतिनिधि व त्याचा मुतालीक व दमाजी गायकवाड यास अनकूल करून घेऊन घांटमाथ्यास व कोंकणांत शिबंदी ठेवण्यास कारभारी पाठविलें. याप्रमाणें आपला बेत सिध्दीस जाण्याकरितां याची प्रसिध्दि लोकांत न व्हावी ह्मणून नित्य बोलत असे कीं, मी आपल्या भ्रताराबरोबर सती जाईन. हा मनसोबा पेशवे यांनी जाणून छ १८ रमजान रोजी (२१ आगस्ट १७४९) आपण व जनार्दनबाबासुध्दां शिंदे, होळकर असे सरदार ३५००० फौजेनिशी पुण्याहून निघून साता-यास आले. पुण्यास बंदोबस्तास दादासाहेब व भाऊसाहेब यांस ठेविलें. पेशवे साता-यास आल्यावर यांनी असा विचार केला कीं, या वेळेस ताराबाईचा पक्ष स्वीकारावा. सकवारबाईनें प्रतिनिधि व सेनापति वगैरे अनुकूल करून फौज जमविली. त्यांनीं संभाजी करवीरास आहेत याजकडे जावें, व संभाजीनीं त्या फौजेसुध्दां साता-यावर यावें अशी मसलत केली. तेव्हां शाहू महाराज यांनी तिकडे बापूजी खंडेराव यास पाठवून जिजाबाई व कारभारी मंडळींत भेद करून ही गोष्ट सिध्दीस जाणार नाही असे संभाजीस सांगून माघारें फिरविलें. सकवारबाईनें रघोजी भोसले व सेनापति गायकवाड यांस जलद येण्याविषयीं पत्रें पाठविली. ते वेळेस आले नाहींत. यमाजीपंत यांनी राणीचे आज्ञेनें ताराबाईचे बंदोबस्तास आपले बंधु अंताजी शिवदेव याजबरोबर लोक देऊन पाठविलें. पंतप्रधान यांनींही किल्ल्याशीं राजकारण करून लोकांस बक्षिसें द्यावयाचें कबूल करून यादो गोपाळ व गोपाळ यादव व बाजी यादव यांस ताराबाईजवळ ठेवून किल्लेदार अनंतराव जाधव, जोतीपंत सुभेदार हे वश करून ठेविले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries