मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१५२]                                                                        श्री.                                                             २४ सप्टेंबर १७५५.

आशीर्वाद उपरी. कुरा कडा दिल्लींत इजारा तीन साला करून घेतला. श्रीमंत र॥ दादा स्वामीचें आज्ञेवरून त्यास फाल्गुनमासीं अम्मल सुरूं जाला. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, तीन महिने मामलियत जाली. खरीफ बकरुल्लाखान खाऊन गेले, रब्बीपैकीं कांहीं फौजेनें उजाड जालें, कांहीं राहिलें तें शिवबंदीस खर्च जाला. घोडीं पडिलीं, बक्षिसें दिलीं. त्यास एक पैसा जे रुपये सरकारी भरिले त्यांत- एक पैसा आमचा उगवला नाहीं. सालमजकुरीं दिल्लीत गडबड केली त्याजवर पेशगी दोन लाख व दरबार खर्च पन्नास हजार हे दिल्लींत भरिले. मामला रुपये खराबिला. असो. आह्मीं जे मेहनत केली ते एक ईश्वर जाणत असेल. तीन महिने अम्मल जाला आणि श्रीमंत स्वामींनी घालमेल केली. त्यास मीहि येथून निघालों. इकडे फौज नाहीं. र॥ जयाजी शिंदे यास दगा राठोडांनीं केला. जिवें मारिलें. त्याजवर र॥ दत्ताजी शिंदे यांणीं ठासून राखिलें. अलीकडे जेनगरवाला माधोसिंग राजे यांणीं, गोविंद तमाजी तेथें रहात होते त्याजला, जिवें मारिलें, घरदार लुटलें, समागमें त्यांचे आणीकही मारिले गेले. असें वर्तमान आहे. त्याजकरितां इकडे तमाम रजवाडे जमीदार लबाडीस आले. इटावेयाजवळ जमीदारांशीं व आमचे लोकांशीं झुंज जालें. वीस घोडें ठार जालें. दहा भले माणूस ठार जालें. वीस माणूस जखमी. जमीदाराकडील घोडीं माणसें ठार जालीं, जखमीहि जालीं, मोडून गांवांत पातले. सारांश, गडबड जाली. याजकरितां आह्मी यमुनातीरीं राहिलों, फौज जमा करून त्यांचे मदतीस पाठविली आणि आह्मी यमुना उतरून रायपुरास आलों. आतां दरमजलींनीं पुणेयासी येऊन. र॥ अंताजी माणकेश्वर याजकडील फौज न आली. ते मारवाड प्रांतें गेले. थोडी बहुत कांहीं दिली ते इटावेयाकडे गेले. र॥ गोपाळराउ येथें आहेत त्याजला आह्मीं सांगितलें. सनद श्रीमंत स्वामींनी तुह्मांस करून दिली ते आह्मास प्रमाण, परंतु आमचे रुपये गुंतले हे द्यावे, जामिनी कहाडून द्यावी, सुखरूप अम्मल करणें, हें तुह्मांस न होय तर आह्मी श्रीमंत स्वामीजवळ जातों. आह्मीं कांहीं हरामखोरी केली नाहीं, चाकरी केली, मेहनत केली, झुंज केली, रुपये दिल्हे. असो. सर्व विनंती श्रीमंत स्वामीजवळ करून, जे आज्ञा खावंद करितील ते आह्मी करू. याप्रमाणें होत आहे. परंतु तें मनास येईल त्याप्रमाणें श्रीमंत स्वामीस नालिशी लिहितात. याजकरितां तुह्मी श्रीमंत स्वामीस विनंती करणें जे, आह्मी तुमचे बारगीर आहों, खावंदाची आज्ञा प्रमाण. परंतु, खावंदानें कांहीं तरी आमचे कष्ट, मेहनत चित्तांत आणावी. जे कोणेप्रकारें चाकरी केली आहे आणि रुपये भरिले तो आमचा मजुरा तो श्रीमंत स्वामीजवळ न जाला. उलटी आमची बदनाम नालीस होते. त्यास आह्मी दरमजलींनी श्रीमंत स्वामीजवळ येतों. श्रीमंत स्वामीस साद्यंत वर्तमान विदीत करून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करून. आह्मी जें कार्य करून तें एक खावंदाचें करून. दूर आहे याजकरितां कोणी बदनामी लिहितील. त्यास, तुह्मी श्रीमंत स्वामीस विनंती करणें. आमची नालीस कोणीं करावें असें कर्म चाकरींत नाहीं. उरूबरू येतों. विनंती करून. र॥ गोपाळराउ यासी सलूख करून येऊन. त्यासी कजिया आह्मी करीत नाहीं. धनी मायबाप आहेत. विनंती आपली करून जे आज्ञा श्रीमंत करतील तेंच आह्मी करून. श्रीमंत स्वामीस माझे चाकरी कशी केली हें तरी मजुरा होईल. झुंजामध्यें कोणेप्रकारें मेहनत केली हें सर्व विनंती करून. हें काम आहे. आणीक चार कामें आहेत. श्रीमंत स्वामीचे किफायतीचीं आहेत. पत्रीं लिहितां येत नाहीं. उरूबरू विनंती करून. उरूबरू जालियास, श्रीमंत स्वामींनीं विनंती आमची ऐकिलियास, बहुत संतोषी होतील. हेंच पत्र श्रीमंत स्वामीस दाखवणें. कामें बहुत आहेत. कांहीं चिंता नाहीं. येथून येतों. सर्व श्रीमंत स्वामीस विदित करून. मित्ती आश्विनवद्य ४. हे आशीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries