मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

७०. साहाय्य कोणत्या प्रकारचें पाहिजे? द्रव्यसाहाय्य पाहिजे, कीं मनुष्यसाहाय्य पाहिजे, कीं सानुभूति पाहिजे किंवा केवळ भरपूर स्तुति पाहिजे? असा प्रश्न उद्भवणें साहजिक आहे. पैकीं उत्तराला प्रारंभ करतांना, स्तुति व च्युति ह्या दोन जखिणींचीं बि-हाडें जवळजवळ आहेत, हें प्रस्तुत लेखक जाणून आहे. तेव्हां, ह्या, चरम साहाय्याची तो अपेक्षा करीत नाहीं. बाकीच्या तिन्ही प्रकारच्या साहाय्याची दिवसेंदिवस फारच अवश्यकता भासमान होत आहे. ती कशी तें सविस्तर नमूद करण्याची परवानगी घेतो.

७१. शक १८१० त काव्येतिहाससंग्रहादि साधनांची व ग्रांटडफादिरचित पाश्चात्य बखरकारांची मीं तुलना केली. तीवरून अशी खात्री होत चालली कीं, डफादि मंडळीच्या लेखांतून येणा-या अपविचारांची व अपविधानांची दुरुस्ती विश्वसनीय साधनें शोधून करणें जरूर आहे. शक १८१२ पासून अस्सल व विश्वसनीय साधनें शोधण्याच्या खटपटीस प्रारंभ करून १८२० त साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. हा खंड तीनदां छापला गेला. पहिली प्रत पुण्यास श्रीविठ्ठल छापखान्यांत १८१९ सालीं छापली, ती सबंदश्रीविठ्ठल छापखान्याबरोबर अग्नयेस्वाह झाली. तिचा सर्व खर्च केवळ अंगावर पडला. सुमारें एक हजार रुपयाचें नुकसान झालें. पैकीं छपाईंचें नुकसान छापखान्याच्या मालकांनीं सोसलें व कागदाचें नुकसान माझें माझ्या अंगावर राहिलें. तें अद्याप तसेंच आहे. दुसरी प्रत पाव अष्टमांश सापकराच्या छापखान्यांत छापिली; परंतु अशुद्ध फार निघूं लागली म्हणून रद्दीच्या भावानें वाण्याला विकली. तिसरी प्रत वांईस भाऊशास्त्री लेल्यांच्या मोदवृत्तांत छापिली व प्रथम प्रसिद्ध केली. तिच्या छापणावळीस श्रीमंत बाळासाहेब मिरजकर यांनीं चारशें रुपयांची देणगी दिली. बाकीचा सहाशें सातशें रुपये खर्च विक्रींतून काढला. हा खंड छापीत असतां शोधानाचें काम चालूंच होतें व अद्यापिही चालूं आहे. पहिला खंड छापल्यानंतर चौथा खंड चित्रशाळेचे मालक रा. रा. वासुदेवराव जोशी यांनीं आपल्या जबाबदारीवर प्रसिद्ध केला. दुसरा, तिसरा, पांचवा, सहावा व आठवा असे पांच खंड प्रो. विजापूरकर यांनीं ग्रंथमालेंतून स्वतःच्या खर्चानें छापून काढिले. पैकीं ग्रंथकाराच्या मेहनतीचा अल्पस्वल्प मोबदला म्हणून ग्रंथमालाकार प्रत्येक खंडाच्या पन्नास प्रति मला देतात. त्या विकून शोधनाचा व प्रवासाचा खर्च मोठ्या काटकसरीनें मी करतों. ह्या पुस्तकविक्रीपासून आजपर्यंत सरासरी सहाशें रुपये प्राप्ति मला झालेली आहे. ह्या अवधींत सुमारे ५०० रुपये श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर, रा. रा. पांडोबा शिराळकर, रा. रा. रावजी भिडे ह्या तीन मंडळींनी आपखुषीनें व उदारपणानें दिले. शिवाय दोघा तिघा स्नेह्यांकडून प्रवासाकरितां सहाशें रुपये मीं कर्ज काढलें, मिळून आजपर्यंत स्वतः च्या खर्चाने व लोकांच्या देणग्यांनीं मीं सुमारें ३६०० रुपये ह्या कामीं खर्चिले आहेत. पैकीं देण्यांचे व पुस्तकविक्रीचे २१०० रुपये वजा जातां सध्यां मला १५०० कर्ज आहे. ९०० रु. वासुदेवराव जोशांचे, २०० रुपये प्रो. विजापूरकरांचे, ३०० रुपये रा .रा. जनार्दन नीळकंठ पेंडसे यांचे व ४५ रुपये कै. सदाशिवराव परांजपे यांचें कर्ज आहे. पैकीं वासुदेवराव जोशी यांचे मूळचे कागदाचे ५०० किंवा ६०० रुपये होते, ते व्याजानें आठनऊ वर्षात ९०० झालेले आहेत. इतर लोक व्याज घेत नाहींत हें कर्ज पुढील खंडांच्या विक्रीनें फेडावयाचें आहे. मी प्रवासखर्च व चरितार्थ बिनबोभाट कसा चालवितों हें पुष्कळ लोक मला विचारतात. त्यांच्या समाधानार्थ हा कंटाळवाणा तपशील दिला आहे. माझे धनको माझ्यावर बहुत प्रेम करीत असल्यामुळें, त्यांच्या अडचणींच्या प्रसंगींहि त्यांनीं मला फारशी कधीं निकड लाविली नाहीं, हें खरें आहे. परंतु, कर्ज आहे, ही कठोर बाब विसरतां येत नाहीं.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries