मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

७४. हे प्रचंड व दीर्घकालावर्ती कृत्य साधणार कसें? कोणचा उपाय योजला असतां व कोणतें यंत्र निर्मिलें असतां, हें कार्य तडीस लागण्याच्या मार्गाला लागेल? आमच्यासारख्या एकट्यादुकट्या भुकेबंगालाच्या जीवापाड परिश्रमानें ह्या कामाचा प्रारंभहीं झाला म्हणणें हास्यास्पद आहे. कीर्तन्यांनीं सहा महिने खपून दोन बखरी, सान्यांनी बारा वर्षे खूपन चाळीस बखरी, ख-यांनीं वीस वर्षे खपून दोन हजार पृष्ठें व मीं पंधरा वर्षे खूपन चवेचाळीसशे पृष्ठें प्रसिद्ध केलीं. ह्या सर्वांनीं केलेलें काम, एखाद्या राजानें, महाराजानें किंवा सार्वभौमानें दोन रखेल्यांचा वर्षाभराचा मेहनताना ह्या कामीं खर्चिण्यानें मनांत आणिलें असतें, तर पंधरा हजार रुपयांच्या व्ययानें सहा महिन्यांत सहज आटोपलें असतें. पण बेलिफाचें शिक्षण मिळालेलें व पोलीस शिपायाचे विलास भोगूं इच्छिणारे नृपाधम जोंपर्यंत गाद्यावरून लोळत आहेत, तोंपर्यंत त्यांच्यापासून प्रोत्साहन राहूंद्याच, सामान्य साहाय्यहि मिळण्याची आशा करणें व्यर्थ आहे. बेलिफांनीं न्यायमीमांसा व पोलीस शिपायांनी राजनीति कशाशीं तोंडीं लावावयाची? राजांचा खालचा जो जमीनदार, इनामदार वगैरेंचा वर्ग तोहि अद्यापि निद्रापद भोगीत आहे. शेतकरी, उदमी, कारकून व पंतोजी हे बोलूनचालून काबाडकष्ट करणारे लोक त्यांच्यापासून ह्या कामाला साहाय्य कसें मिळणार? रहातां राहिले आंग्लशिक्षित लोक, मास्तर, वकील, हायकोर्ट वकील, मुन्सफ, जज्ज, इंजिनेर, डॉक्टर, वगैरे जे बूटपाटलोणवाले बडे बडे महंत आहेत, त्यांची तर ह्या कृत्यावर बहुत खपा मर्जी झालेली दिसते. बड्या बड्या विद्वानांचें व महान् महान् देशहितकर्त्यांचें निवासस्थान जें मुंबई शहर त्या राजधानींत पांच पन्नास पृष्ठांचें एखादें ऐतिहासिक मासिक पुस्तक सहज चालेल ह्या आशेनें आमच्या एका हायकोर्ट वकील मित्रानें एक मासिकपुस्तक मोठ्या उत्साहानें सुरूं केलें. महंतांच्या व ऋषींच्या कर्णपथावर आरंभिलेल्या कार्याची वार्ता आदळली व कित्येक विद्वद्रत्नांकडून द्रव्यसाहाय्याचीं आश्वासनेंहि मिळविलीं. आणि एवढा थोरला कडेकोट बदोबस्त होऊन, ह्या मासिकाला सात महिन्यांतच गाभाटावें लागलें? पुरे शंभरहि वर्गणीदार मिळाले नाहींत, आणि जे मिळाले त्यापैकीं शेकडां नव्वद भिडेखातर मिळाले. केवळ स्वदेशाच्या चरित्रप्रेमानें झालेला वर्गणीदार ह्या संतमहंतांतून एखाददुसरा झाला असल्यास न कळे. विद्वान् व देशहितकर्ते म्हणून ज्यांना म्हणतात त्यांची कळकळ असली आहे. केवळ ज्ञानार्जनांतच नव्हे, तर खाण्यापिण्यांत व वस्त्रप्रावरणांत सुधारलेल्या पाश्चात्यांचें सर्वस्वीं अनुकरण करण्याचा बाणा बाळगणा-या ह्या मुंबईंतील देशभक्तांनाहि औदासिन्यानें व संन्यासप्रणवतेनें सोडलें नाहीं. प्रपंच, इतिहास, समाज ह्यांचें हित करण्याचा उपदेश ज्यांनीं पाश्चात्यांपासून घेतला त्यांनीं स्वसमाजाच्या चरित्राच्या प्रसिद्धीकरणार्थ वर्षांतून शांपेनच्या एका अर्ध्या बोतलचीहि किंमत देऊं नये? परंतु, स्वार्थाचा त्याग करण्याला ज्यांना पाश्चात्यांनीं शिकविलें त्यांनीं स्वेतिहासाचा व स्वत्वाचा त्याग करूं नये तर काय करावें ! येणेंप्रमाणें समाजांतील बहुतेक सर्व वर्ग आंग्लभाषाकोविद व अकोविद - औदासिन्यानें घेरलेला आहे. तेव्हां, आतां, हें काम व्हावें कसें?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries