मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

शके १७२१ सिद्धार्थी नाम संवत्सरे, सुरु सन मया तैन व अलफ सन १२०९ संवत १८५६, राजशक १२६ इसवी सन १७९९ व १८००.

१ चैत्र व॥ २ रविवारीं शंकरराव रघुनाथ सचीव भोरास मृत्यु पावले. मरतेसमंई दत्तक पुत्र घेतले त्याचें नांव चिमणाजी शंकर ठेविलें. येविषयीं शंकरराव रघुनाथ सचीव यांचें पत्र नानास आलें आहे त्याजवरून. छ. १५ जिल्काद.

२ दौलतराव शिंदे यांनीं बायाचा समेट व्हावा याकरतां बाळोबा पागनीस व धोंडोबा व बनी मोदी नगरांत कैदेंत होते त्यांस नगराहून सोडून आणिलें ते चैत्र वद्य ३ सोमवारीं छ. १६ जिल्कादी वानवडी वाड्यांत येऊन भेटले. त्यास वस्त्रें जवाहीर दिलें. आणि कारभारांत घातलें. नंतर बाळोबातात्या व बाबुराव आंग्रे व आबा चिटणीस त्रिवर्ग मिळून बायाचा समेट करविला. बाया जेजूरी आलीकडे रोज बुधवार भाद्रपद व॥ ७ मीस येऊन राहिल्या. बाळोबा वगैरे वानवडीस आले. नंतर बायानीं सांगोन पाठविलें कीं, आमचे जवाहीराचे सजोग आहेत ते आह्माकडे या मुक्कामीं पाठवावें ह्मणजे आह्मी लष्करांत येऊं. त्यांजवरून बाळोबा तात्यानीं शिंदे यास सांगून बायाचे सजोग बायाकडे पाठविलें. ते घेऊन बाया कूच करून वानवडीस न येतां पैठणबाब गांवचे सुमारें गेल्या. तेव्हां शिंदे यानीं बाळोबा तात्यास विचारलें, त्यांनीं सांगितलें कीं गेल्या तरी चिंता नाहीं. असें बोलोन नारायणराव बक्षी यांस बायाचे लष्करांतून बोलावून आणिलें व फौजही फोडून आणिली. बाबूराव आंग्रे यांची रवानगी कुलाब्यास करून सारा कारभार पागनीस करू लागले, बाया गंगेकडे गेल्या,

३ अप्पा बळवंत चैत्र व॥ ३० छ. २८ जिल्कादी पुणें येथें मृत्यु पावले. मरणसमयीं दत्तक पुत्र घेतला. त्याचें नांव बळवंत कृष्ण ठेविलें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries