प्रस्तावना

८०. पाणिनिकालापर्यंत ह्या कृष्णवर्ण ब्राह्मणांदींची संख्या बाताबेताचीच असल्यामुळे त्याच्या काली ह्या ब्राह्मणांदींची कुत्सना विशेष होण्याचा प्रसंग उद्भवला नाही. तथापि, पाणिनीच्या काळीसुद्धा ह्या कृष्णवर्ण ब्राह्मणादीची संख्या इतकी बरीच वाढली होती की शुक्लवर्ण त्रैवर्णिकांची व कृष्णवर्ण त्रैवर्णिकांची स्पर्धा होण्यापर्यंत पाळी आली. शुक्ल व कृष्ण पक्षांच्या स्पर्धेचे सर्वप्रसिद्ध उदाहरण म्हटले म्हणजे तैत्तिरीयांचे व याज्ञवल्ल्याचे भांडण. हे भांडण पाणिनिपूर्वी नुकतेच घडले असावे. कारण पाणिनी याज्ञवल्कब्राह्मणाला ऊर्फ शतपथब्राह्मणाला अर्वाचीन म्हणतो (४-३-१०५). तैत्तिरीयसंहितेच्या ब्राह्मणभागाची भाषा व शतपथब्राह्मणाची भाषा समकालीन व सारख्या असून दोन्ही पाणिनीयभाषेहून किंचित जुन्या व ऋग्भाषेहून ब-याच अर्वाचीन आहेत. वैशंपायन तैत्तिरी हा भीष्मपर्वाच्या नवव्या अध्यायात उल्लेखिलेल्या तित्तिरिदेशचा अभिजन असून कृष्णवर्ण ब्राह्मणांचा कैवारी होता आणि त्याचा भाचा याज्ञवल्क्य हा शुक्लवर्ण ब्राह्मणांचा पुरस्कर्ता होता. ह्या मामेभाच्यांच्या स्पर्धेचा असा कळस झाला की त्यांचे अनुयायी त्याकालापासून पुढे अन्योन्यशरीरसंबंधही करीतनासे झाले. पाणिनीच्या पूर्वी व पाणिनीच्या काली शुक्लकृष्णांची ही स्पर्धा शरीरसंबंधपराङ्मुखतेपर्यंतच तेवढी पोहोचली. पाणिनीच्या पश्चात् त्या स्पर्धेला जास्त तीव्र व भयंकर रूप प्राप्त झाले. शुक्लवर्ण ब्राह्मण कृष्णवर्ण ब्राह्मणांची शुद्रोत्पन्न म्हणून थट्टा करीत. ती सहन न होऊन कित्येक कृष्णवर्ण ब्राह्मणांनी व क्षत्रियांनी व वैश्यांनी ब्राह्मणधर्माची, आचाराची, यज्ञांची, श्राद्धांची, संस्कृतभाषेची, वेदाची व त्यातील देवादिकांची निंदा करण्यास प्रारंभ केला आणि चातुर्वर्ण्य व ब्राह्मणादित्व यांना सोडचिठ्ठी दिली. दोन भिन्नसंस्कृतींच्या उत्कृष्टनिकृष्ट समाजांध्ये शरीरसंबंध झाल्याने हे असले प्रकार झाल्याशिवाय रहात नाहीत. प्रथम वर्णावरून वैषम्य उत्पन्न होते आणि ते वैषम्य नंतर आचार, देवधर्म, चालीरीती, वेदान्त, राजकारण, समाजव्यवस्था इत्यादी समाजाच्या अंतस्थ, बहि:स्थ, शारीरिक व मानसिक अशा सर्व हालचालींत भिनून, बहुरूपी सामाजिक क्रांती घडवून आणिते. वैषम्याने स्पर्धा उत्पन्न होते. स्पर्धा उत्पन्न झाली म्हणजे दोन्ही पक्ष अन्योन्यदोष हुडकू लागतात व दोषैकदृष्टी होऊन प्रतिपक्षांच्या गुणांनाही दोष समजून त्यांचा विटाळ धुवून टाकण्यास प्रवृत्त होतात. त्या प्रमाणे पाणिनिकाला नंतर हजारो कृष्णपक्षाभिमानी त्रैवर्णिकांनी शुक्लपक्षाचा द्वेष करता करता मूळच्या ब्राह्मणधर्माचाच द्वेष आरंभिला आणि ब्राह्मणांचे गुरुत्व झुगारून देण्याच्या इच्छेने उपनयनादिक्रिया करण्याचे सोडून देऊन ब्राह्मणांचे मुखावलोकनही करावयाचे नाही असा निश्चय केला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries