प्रस्तावना

ई) पूर्ण अहिंसेचे मत पुकारून हिंसा करणा-या यज्ञयागांना जैनबौद्धांनी दुष्ट ठरविले.

ड) पितृपूजामूलक श्राद्धकर्म बालिश ठरवून जैनबौद्धांनी त्रैवर्णिकांच्या वंशपरंपरेला लत्ताप्रहार केला. क्षुद्र, वृषल व व्रात्य ह्यांना त्रैवर्णिकांचे शुद्धवंशत्व अगदी वावडे भासे. तेव्हाही ही बाब बौद्धजैनांना उपकारकच झाली.

ऊ) ज्या आश्रमधर्माच्या पायावर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे त्रैवर्णिक क्षुद्रांच्या कष्टावर उपजीविका करीत, विशेषत: ब्राह्मण फुकट चरत, तो आश्रमधर्म बंद करून जैनबौद्ध स्वत: भिक्षु व श्रमण बनून ब्राह्मणांप्रमाणे इतर लोकांवर निर्वाह करू लागले.

ऋ) घरातील क्षुद्रस्त्रिया, क्षुद्रसेवक व क्षुद्रोत्पन्न ब्राह्मण पोरे यांच्या संख्याबाहुल्याने व ह्यांच्याशी सदा व्यवहार पडल्याने शुद्ध त्रैवर्णिकांच्या

गृहपत्न्यांचाही आचार, विचार व भाषा प्राकृत झाली. त्यामुळे घरात मुख्य जो ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य तो एकटाच तेवढा संस्कृत बोलणारा व शुद्ध आचारविचार बाळगणारा राहिला. आर्यस्त्रिया ही केवळ क्षुद्रस्त्रीवत् होऊन गेल्या. एणेप्रमाणे गृहपती व गृहपत्नी यांचा दूरीभाव बौद्धजैनांच्या उपयोगी पडू लागला.

ऋृ) नट, करण, शक, निच्छिवि इत्यादी व्रात्यांचे आयुधजीवी गण लढाऊ असल्यामुळे शुद्ध क्षत्रियांची राज्ये त्यांनी आस्तेआस्ते आक्रमण केली आणि शेवटी महानंदी शैशुनाग ह्या क्षत्रिय सम्राटाचा क्षुद्रागर्भोद्भव जो महापद्म नंदनामक पुत्र त्या क्षुद्राने साम्राज्यपदारोहण केले. ह्या महापद्म नंदाने शुद्ध-क्षत्रियांचा संहार केला. एणेप्रमाणे त्रैवर्णिकांच्या हातची राजकीय सत्ताही गेली. त्यामुळे जैनबौद्धांना निर्वाण दोन बोटे उरले व ब्राह्मणादींचा अपकर्ष परा सीमेस पोहोचला.

लृ) जैनबौद्धांनी स्याद्वाद, बहि:शून्यवाद, अन्त:शून्यवाद, सर्वशून्यवाद, सर्वक्षणिकवाद इत्यादी मानसशास्त्रीय व अध्यात्मशास्त्रीय नवेनवे शोध करून, त्रैवर्णिकांच्या औपनिषद ज्ञानाला मागे टाकिले आणि ब्राह्मणादींच्या अध्यात्मशोधक बुद्धीला हिणकस ठरविण्याचा घाट घातला.

लृ) नवीन ऐतिह्य, नवीन दैवते, नवीन नीती, नवीन प्रव्रज्या, प्रचलित करून व अल्पायासाने दीर्घफल प्राप्त करून देण्याच्या सामान्य जनांना गुळचट थापा मारून बौद्धजैनांनी शुद्ध त्रैवर्णिकांची व सामान्य प्राकृत जनतेची फाटाफूट व ताटातूट करून टाकली.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries