प्रस्तावना

सबब, धर्मज्ञांनी दुसरा एक कायदा केला. तो असा की, त्रैवर्णिकांची क्षुद्रस्त्रीजन्य अपत्ये पितृसवर्ण न समजता, मातृसवर्ण समजावी. हा कायदा त्रैवर्णिक समाजाला मानला व त्याची अंमलबजावणी शक्य झाली. क्षुद्रस्त्रियांशी लग्न लावण्याची जी दासकर्मोपयोगी रुढी त्रैवर्णकांच्या इतकी आवडीची होती तिला धक्का बसला नाही आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या त्रैवर्णिकांत क्षुद्रस्त्रीजन्य प्रजेची भरती जी होत असे ती तर होण्याचे बंद झाले. कायदे करणारे व कायदे पाळणारे अशा दोघांच्याही हिताचे संपादक असे कायदे जेव्हा घडले जातात तेव्हा त्यांची अंमलबजावणी शक्य व सुकर होते. ह्या दुस-या कायद्याचा असा परिणाम झाला की आजपर्यंत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व क्षुद्र हे चार वर्णच चार जाती होत्या. त्या चार जातींच्या जोडीला आता आणीक तीन पोटजाती समाजात अस्तित्वात आल्या. त्या तीन जाती म्हणजे (१) ब्राह्मण x क्षुद्रा = निषाद ऊर्फ पारशव, (२) क्षत्रिय x क्षुद्रा = उग्र व (३) वैश्य x क्षुद्रा = करण ऊर्फ रथकार, ह्या होत. ह्या तीन जाती क्षुद्रतम धरल्या जात, परंतु चातुर्वर्ण्यातील चवथा वर्ण जो सच्छ्द्रांचा तो ह्या संकरांना आपल्याहून निराळा समजे. निषाद, पारशव, उग्र व करण ही चारही नावे भरतखंडात पोट भरावयास आलेल्या किंवा एतद्देशज अनार्य व म्लेच्छ लोकांची आहेत. निषाद हे एथील भूमिज धीवर होत. पारशव हा शब्द पार्शव ह्या अक्षरविन्यासानेही आढळतो आणि हाच विन्यास ह्या शब्दाचा खरा होय. पर्शु नावाच्या आयुधजीवी परदेशस्थ अनार्याचा संघ पाणिनी उल्लेखितो. पर्शुसंबंधक जे ते पार्शव. पारशव हा खोटा पाठ घेऊन परस्मै शवाय हित: पारशव: इत्यादी व्युत्पत्ती केवळ अज्ञ आहे. उग्र हे पामीरच्या उत्तरेकडील ओगर अथवा ओग्र Uigurgur नावाचे अनार्य लोक होत. करण ही ही एक अनार्य जातीच होती. ह्या अनार्य जातीशी काही एक कल्पित किंवा वास्तविक साम्य भासून तत्कालीन आर्यांनी ह्या संकरांनाही अनार्यांची नावे दिलेली आहेत. आपल्या संकरांना अनार्यांची नावे देण्याची खोड आर्यांना फार होती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries