प्रस्तावना

८१. चातुर्वर्ण्यात क्षुद्राला घेतल्यापासून व क्षुद्रस्त्रियांशी विवाह करून तजन्य प्रजा त्रैवर्णिक मानिल्यापासून ही सर्व अनवस्था व क्रांती ओढवली आहे, हे ओळखून ब्राह्मणांनी अद्याप चातुर्वर्ण्यात राहिलेल्या क्षुद्र व क्षुद्रस्त्रिया ह्यांच्याशी घडणारे संबंध नियमित करण्याचा उपक्रम केला. चातुर्वर्ण्यातून क्षुद्राला काढून लावणे अशक्य होते व शक्य झाले असते तरी त्रैवर्णिकांच्या फायद्याचे नसून उलटे नास्तिकांच्या व बौद्धांच्या संख्येत भर घालणारे होते. सबब, निष्कासनाचा मार्ग न धरता, क्षुद्रनियमनाचा उपाय त्रैवर्णिकांनी पत्करला. क्षुद्रस्त्रीजन्य प्रजा पितृजातीय एव्हापर्यंत समजली गेल्यामुळे त्रैवर्णिकांत शौद्र रंग, शौद्र स्वभाव व शौद्र वृत्त यांचा प्रसार होऊन, जैनबौद्धादि पाखंडे जन्मास आली. सबब, धर्मज्ञांनी व पूर्वेतिहासज्ञांनी असा कायदा केला की, क्षुद्रस्त्रीशी त्रैवर्णिकाने कोणत्याही स्थितीत (कस्मिन्नपि वृत्तान्ते) व कसल्याही आपत्तीत (आपद्यपि) विवाह करू नये (मनु, अध्याय ३ श्लोक १४), वृत्तान्ते म्हणजे इतिहासाख्याने असा अर्थ कुल्लूक करतो, परंतु तो दुष्ट आहे; कारण, भारतादि इतिहासातून असल्या हीनजातीय विवाहांची हवी तितकी उदाहरणे सापडतात. वृत्त म्हणजे वार्ता, स्थिती. अत्रि, गौतम, शौनक व भृगु ह्या पूर्वस्मृतिकारांचा एतत्पोषक हवाला भृगुसंहिताकार देतो. पाणिनीच्या नंतर झालेले सर्व स्मृतिकार (उपलब्ध सर्व स्मृतींचे कर्ते पाणिनिनंतर झालेले आहेत.) व सूत्रकार (बहुतेक सर्व उपलब्ध श्रौत, धर्म व गृह्यसूत्रे पाणिनिपश्चात्क आहेत) हाच नियम सांगतात किंवा त्याचा ध्वनी करतात. वसिष्ठ म्हणतो की, नाग्निचित् क्षुद्रां उपेयात्, कृष्णवर्णा सा सरमा इव, न धर्माय. शांखायनश्रौतसूत्रकार तर ह्याच्याही पुढे जाऊन क्षुद्राचा विटाळही गर्ह्य मानतो. न च क्षुद्रेण दोहयेत् (२-८-३). क्षुद्र कडून दूध ही पिळून घेऊ नये, इतका तीव्र कटाक्ष बौद्धक्रांतीमुळे क्षुद्रा वरती ह्या सूत्रकाराचा होता. हा कायदा मोडला असता फल काय मिळते तेही स्मृतीकार सांगतात. कुविवाहाने म्हणजे क्षुद्राविवाहाने ब्राह्मण ब्राह्मण्यापासून च्युत होतो. केवल क्षुद्रस्त्री पासूनच तेवढी अपत्ये झाली असता घर क्षुद्रमय होऊन जाते, वेदाध्ययन बंद पडते, ब्राह्मण अतिथी पराङ्मुख होतात, श्राद्धादि पित्र्यकर्मे पितृदेव मान्य करीत नाहीत व इंद्रादिदेव होम स्वीकारीत नाहीत, म्हणजे वैदिकधर्म म्हणून ज्याला म्हणतात तो सर्व उच्छिन्न होतो. ह्या फलाचा कटु अनुभव केवळ तर्कगम्य नव्हता, तर बौद्धक्रांतीने त्रैवर्णिकास साक्षात् आलेला होता. तो कटु अनुभव पुन्हा येऊ नये व वैदिकमार्ग पुन्हा पूर्ववत सर्वत्र प्रचलित व्हावा, या हेतूने क्षुद्राविवाहनिषेधाचा हा नामांकित कायदा पाणिन्युत्तरकालीन धर्मज्ञांनी प्रचलित केला. ब्राह्मणजातीतील क्षुद्ररंगाची म्हणजे काळ्या रंगाची कन्या वरू नये (नोद्वहेत् कपिलां कन्यां) एथपर्यंत तिटका-याची मजल येऊन ठेपली. ह्या कायद्याने क्षुद्रस्त्रीशरीरसंबंध अजिबात बंद पडून अपकृष्ट त्रैवर्णिक निपजण्याची शक्यताच राहिली नाही. तथापि, ह्या कायद्याची अंमलबजावणी कशी करावयाची, ही एक तत्कालीन धर्मज्ञांना मोठी अडचण पडली. क्षुद्रस्त्रियांशी विवाह करून, घरात भोगास व कामकाजास हक्काच्या व मायेच्या मोलकरणी पैदा करण्याची सवय शतकेच्या शतके त्रैवर्णिकांना लागली होती. ती कायदा केला म्हणून, ताबडतोब जाईल, अशांतली साधी गोष्ट नव्हती. कायद्याने एवढेच केले की उत्कृष्ट विवाहनीती त्या संकटसमयी कोणती तिचा त्रैवर्णिक समाजाला मार्ग दाखविला. ह्या महत्त्वाच्या कायद्याचा त्याहून जास्त उपयोग म्हणजे अंलबजावणी एकदम होण्यासारखी नव्हती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries