कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

हिंदु समाजात हिंद्वितरांचा समावेश

राजवाडे यांच्या विचारप्रणालीची संक्षेपाने मांडणी करणे अवघड काम आहे. त्यांच्या "हिंदु समाजात हिंद्वितरांचा समावेश" या लेखाची वर्ण व जातिभेदाच्या चर्चेला, ती मोडण्याच्या चळवळीला व या चळवळीत आज जी द्वेषभावना येते तिला सौम्यत्व आणून तिला वर्गीय व शास्त्रीय दृष्टीने नष्टभूत करण्याचे काम सुकर होण्यासाठी मार्क्सवादी समाजशास्त्राच्या जोडीला बरीच मदत होण्यासारखी आहे. वर्ण व जातिसंबंधांची उत्पत्ती, उत्पादनाची हत्यारे व तज्जानित समाजसंबंध या सिद्धान्ताच्या पूर्ततेला राजवाड्यांचा हा निबंध अत्यंत उपकारक ठरतो. हिंदूंच्या ग्राम व समाजरचनेचा विचार करताना राजवाडे म्हणतात : "ग्राम किंवा नगर म्हटले म्हणजे ते अठरा पगड जातीखेरीज इतरांचे बनलेले नसे. प्रत्येक धंद्याची स्वतंत्र जात असून त्या जातीचे ग्राम बने. प्रत्येक जात ही आपापल्या धंद्याची वतनदार होती. ज्याला वृत्ती म्हणजे वतन नाही असा मनुष्य ग्रामात हक्काने राहू शकत नसे. इतर ग्रामातून कोणी बेकार आर्य मनुष्य ग्रामात राहण्याची इच्छा करू लागला तर ग्रामातील वृत्तिवंतांची म्हणजे वतनदारांची ग्रामसभा भरून त्यांनी एकमताने- बहुमताने नव्हे-- परवानगी दिली तर त्याची स्थापना गावात होई व तीही उपरी म्हणून हाई. उपरीचा मिरासी म्हणजे पिढीजात ग्रामस्थ होण्यास कित्येक पिढ्या जाव्या लागत. ही कथा आर्य उपरींची झाली.
"अनार्य लोकांचा समावेश ग्रामसंस्था काही विशेष संस्कार झाल्याखेरीज होऊ देत नसत. अनार्य दोन प्रकारचे असत. एतद्देशज अनार्य व बहिर्देशज अनार्य. एतद्देशज अनार्यात नाग, कोल, भिल्ल, गोंड पुक्कस, कातकरी, ठाकुर वगैरे लोक येत. बहिर्देशज अनार्यांत शक, यवन, पारसीक, बाल्हिक, मुसलमान वगैरे लोक येत. नाग, कोल व राक्षस हे या देशात आर्यांच्या पूर्वीचे लोक होत. आर्यावर्तांत व दक्षिणारण्यात व अपरान्तात ग्रामसंस्था जेव्हा केल्या तेव्हा या एतद्देशज अनार्यांना ग्रामसंस्थेत कोणते स्थान कसे द्यावे याचा विचार पडला. या विचारातून सुरक्षितपणे पार पडण्यास आर्यांचा पूर्वीचा एक प्रघात उपकारक झाला. गुणानी व कर्मांनी भिन्न इसमांचे निराळे वर्ण करण्यास आर्य फारे पुरातन कालापासून शिकले होते. त्या शिक्षणाचा ऊर्फ सतत मनःप्रवृत्तींचा परिणाम चातुर्वर्ण्य होय.

"चातुर्वर्ण्यातील चारी वर्ण बीजक्षेत्राने पृथक् होण्यापूर्वी अनुलोम व प्रतिलोम संबंध घडत. त्या संबंधापासून जी प्रजा निर्माण होई तिला तीन पिढ्यांनी किंवा पाच पिढ्यांनी किंवा सात पिढ्यांनी मूळ पित्याच्या वर्णात परत जाता येई.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries