कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

पण तोफांचे शस्त्रसाधन करणे याचे महत्त्व राजवाड्यांना माहीत होते व त्याबाबतच्या शास्त्राबद्दल मराठी विद्वान व राज्यकर्ते गाफिल व गबाळ ठरले असे त्यांचे मत आहे; त्याची तात्त्विक बैठक शोधायची तर या घटनेच्या चर्चेसाठी मार्क्सवादी शास्त्रच वापरावे लागेल. ते काम राजवाडे करू शकले नाहीत हे खरे; पण या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाबद्दल हा विद्वान शास्त्रज्ञ गाफील नव्हता. शहाजीवरील निबंधात ते लिहितात : "या प्रश्नाला उत्तर एकच आहे व अगदी साधे आहे. ते हे की उत्तम रेखीव व नेमके हत्यार बनविण्याची कला पैदा होण्यास शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रात व्हावी लागते ती त्या काली महाराष्ट्रात नव्हती. शहाजीच्या हयातीत युरोपात डेकार्ट, बेकन इत्यादी विचारवंत सृष्टपदार्थसंशोधनकार्याचे वाली जारीने पंचभूतांचा शोध लावण्यास लोकांना प्रोत्साहित करीत होते आणि आपल्याकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत, निपटनिरंजन इत्यादी संत पंचमहाभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशाना स्कू, टाचणी, बंदूक व तोफा यांचा विचार वमनप्राय वाटल्यास त्यात नवल काय ? ज्या दिवशी व्हास्कोने कालिकतच्या चातुरीच्या थोबाडीत मारली तोच हिंदुस्थानचे साम्राज्य युरोपियनांच्या हातात जाऊ लागण्याचा पहिला दिवस होय... लांब पट्टयांची कारीगार हत्यारे त्यात त्यांचे सामर्थ्य होते. ही हत्यारे म्हणजे युरोपियन शास्त्रीय संस्कृतीचा केवळ निष्कर्ष होत...तेव्हा दोषाचा वाटा शहाजीप्रमाणेच तत्कालीन समाजावर पडतो हे उघड आहे...या बाबतीत दादाजीच्या पंक्तीस अकबर, शहाजहान, मीर जुमला व अवरंगजेब असे सारखेच बसतात. तेव्हा हा तत्कालीन भारतवर्षीय संस्कृतीलाच सर्वधारण दोष होय हे कबूल करावे लागते.'' ('राजवाडे लेखसंग्रह ' पान २०६ साहित्य अकाडेमी प्रत )

पण हिंदी समाज तरी असा कां राहिला याचे उत्तर मिळत नाही. त्यासाठी मार्क्स-एंगल्सप्रणीत शास्त्राकडे वळावे लागते. नाहीतर आजच पहा ना ? समाजवादी राष्ट्रांचे शास्त्रीय व सामग्री-सहाय्य व त्याचबरोबर त्याच शास्त्रांचा अभ्यास करून व आपले बुद्धिबल, संपत्ति व राज्यसाधन यांचा वापर करून परकीय तोफानी मार खाल्लेल्या या आपल्या देशातील बुद्धिमतानी शास्त्रज्ञांनी आणि राज्यकर्त्यांनी इथेच बनविलेला रॉकेट तयार केला व न्यूक्लिअर स्फोट करून आमच्या स्वातंत्र्यवाढीला धमक्या देणाच्या साम्राज्यवाद्यांना निरर्गल बडबड करायला लावली. हे पहाण्यासाठी राजवाडे हयात असते तर त्यांनी या नव्या समाजवाद-शास्त्राचे नवे पुरुषसूक्त रचले असते व चातुर्वर्णिकांच्या भुवनसंस्थेतून "एकवर्णी " समाजसत्तावादाचा कम्युनिस्टप्रणीत शास्त्राचा प्रचंड खंड लिहिला असता असे कां म्हणू नये ?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries