भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

[चिपेवे काही वेळेला आपल्या आयांच्या बरोबर व पुष्कळदा आपल्या भगिनी व मुली यांचे बरोबर संभोग करीत. कादिकांच्यात अनिर्बेध संभोग असे, भाऊ-बहिणींचा व बाप लेकींचा. कारीब एकाच वेळी आई आणि मुलगी यांचेशी विवाह करतात.आयर्लेंडचे जुने रहिवासी अनिर्बेधपणे आपले आया व बहिणी यांचेबरोबर विवाह करीत [लिटोर्न्यू-पृ. ६५-६६].

चिपेवे, कारीब वगैरे लोक रानटी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच दर्जाचे महाभारतात वर्णिलेले हे प्राचीन आर्ष लोक होते, असे म्हणावे लागते. आई, मुलगी, बहीण यांच्याशी व्यवाय करणारे असे लोक केवळ प्राचीन आर्षसमाजातच तेवढे होते असे समजू नये. खुद्द कौरवपांडवांच्या काली भारतवर्षात भारतीय म्हणून गणले जाणारे काही समाज प्राचीन आर्षसमाजाइतके किंवा त्यांच्याहूनही विचित्र होते. कर्णपर्वाच्या ४० पासून ४६ पर्यंतच्या अध्यायात कर्ण व शल्य हे एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढीत आहेत. त्यात शल्याला वाक्प्रहार करताना शल्याच्या राज्यातील जे आहीक, आरट्ट, पांचनद व भद्र देश तेथील लोकांच्या निंद्य-म्हणजे आर्यावर्तातील लोकांच्या दृष्टीने निंद्य-चालीसंबंधाने कर्ण म्हणतो, " शल्या, तुझ्या मद्र देशांत पिता, पुत्र, माता, सासू, सासरा, मामा, जावई, मुलगी, भाऊ, नातू व दुसरे बांधव, सोबती, पाहुणे व दासदासी ही सर्व सरमिसळ व्यवाय करतात. त्या देशातील स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी स्वेच्छेने समागम करतात, मग ते पुरुष त्यांच्या ओळखीचे असोत नसोत. स्त्रिया भलतीसलती गाणी गातात. मद्रदेशाच्या सान्निध्याने गांधार देशातीलही चाली बिघडल्या. मद्र देशातील स्त्रिया दारू पितात व वस्त्रे टाकून नागव्या नाचतात. स्त्रिया उंट किंवा गाढव यांच्याप्रमाणे नैसर्गिक उत्सर्ग करतात. मद्र देशातील स्त्रियांपाशी कोणी मद्य मागितल्यास त्या कुले खाजवीत खाजवीत मद्य देणार नाही, वाटेल तर पति किंवा पुत्र देऊ म्हणून म्हणतात. वाहीक देशात जारज प्रजेचे प्रमाण अतिशय आहे. शूद्रांपासून अन्य स्त्रियांच्या ठायी झालेले ब्राह्मण तेथे आहेत. आरट्ट देशात, बहिणीच्या मुलांना वारसाहक्क प्राप्त होतो, पोटच्या पोरांना नाही. वाहिक देशात म्हणजे सध्याच्या:पंजाबात मनुष्य प्रथम ब्राह्मण बनतो, मग क्षत्रिय होतो, नंतर वैश्य होतो, मग शूद्र होतो, शेवटी नापित होतो, पुनः ब्राह्मण बनतो व ब्राह्मणाचा शेवटी गुलाम बनतो. मद्र देशातील कुमारिका निर्लज्ज व अनाचारी असतात. पांचन देशातील लोक कृतयुगांत सुद्धा अधर्माचरण करणारे ठरतील. या शेवटल्या वाक्याचा अर्थ असा की, कृतयुगात सबगोलंकार असल्यामुळे त्या काली सर्वच अधर्म होता; अशा अधर्मी युगातही पांचनद अधर्मी ठरतील. शेवटी कर्ण म्हणतो की, वाहीकलोक भुतलाला लांछन आहेत व मद्रस्त्रिया स्त्रीजातीला लांछन आहेत ! मद्रलोक गुरुपत्नीगमन व भ्रूणहत्या करतात असेही कर्ण म्हणतो. मद्र व वाहीक देशांची ही निंदा एकट्या कर्णानेच केली आहे असे समजू नये. शांतिपर्वाच्या ३२८ व्या अध्यायात नारद व्यासाला सांगतात की, पृथ्वीवर वाहीकलोकांचे वास्तव्य पृथ्वीला कमीपणा आणणारे आहे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries