भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(६) संकीर्ण समागम व उघड्यात समागम या दोन रानटी चालींप्रमाणे प्राचीन आर्षलोकांत तिसरी एक वन्य चाल आहे. आपल्या समाजाहून कर्तृत्वाने, सामर्थ्याने व ऐश्वर्याने जो समाज अतीच अती श्रेष्ठ असेल, त्या समाजातील पुरुषांशी स्वस्त्रियांचा समागम झाल्यास भूषण मानणारे काही निकृष्ट समाज नुकते परवापरवापर्यंत होते.

In Tasmania it was thought an honour for women to prostitute themselves to Europeans, who were ennobled in the eyes of the natives by the prestige of their superiority (Letourneau). (टास्मानियात युरोपियन पुरुषाबरोबर संबंध असणे हा स्त्रीचा मोठेपणा मानला जाई; हे कारण तद्देशीय लोकांच्या दृष्टीने त्यांच्या उत्तमपणामुळे त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालेले होते.) टास्मेनियन लोकांना जो युरोपियन लोकांचा दरारा, आदर, प्रेम वाटे तसलाच दरारा आदर व प्रेम आर्ष मानवांना देव म्हणून कोणी लोक होते त्यांचे वाटे. देवांनी जर कोण्या मानव स्त्रीच्या ठायी गर्भाधान केले, तर आपले भाग्य शिखरास पोहोचले असे प्राचीन आर्षांना वाटे. ह्या समजुतीचे प्रमाणक असे दाखले भारतात व हरिवंशात इतके आहेत की त्याचे परिगणन करण्याची अपेक्षा विशेषशी आपल्या देशात कोणाला वाटणार नाही. इंद्रापासून, यमधर्मापासून, नासत्यांपासून, अग्नीपासून, वायूपासून व इतर देवांपासून आर्ष स्त्रियांना संतती झाल्याच्या कथा विपुल आहेत. देवसमाजासंबंधाने आर्ष लोकांना इतका काही दरारा वाटे की आर्ष लोकांत स्त्री अपत्य जन्मले की त्या वर देवांचा हक्क ते प्रथम कबूल करीत. स्त्री-अपत्य दोन वर्षांचे होईपर्यंत तिच्यावर अमुक देवाचा हक्क, चार वर्षाचे होईपर्यंत अमुक देवाचा हक्क आणि सहा वर्षांचे होईपर्यंत अमुक देवाचा हक्क असे जन्मापासून आर्ष स्त्रियांवर देवांचे अग्र हक्क असत.

सोमः प्रथमो विवेदे गंधर्वो विविद उत्तरः । ऋग्वेद
तृतीयो अग्निष्टे पति स्तुरीयस्ते मनुष्यजाः ॥ १०।८५।४०

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries