भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(२) ऋषींचे अतिप्राचीन पूर्वज वानरीय पाशवावस्थेत असताना, वानरांप्रमाणेच त्यांनाही झाडे, पर्वतांचे कपरे, गुहा वगैरेंच्या आश्रयाने राहून हिंस्त्र पशूंपासून, वादळांपासून व थंडीवा-यापासून आपला बचाव मोठ्या संकटाने करावा लागे. अशा दुरवस्थेत पशूंहून व पक्ष्यांहूनही कष्टतर स्थिती पशुतुल्य ऋषिपूर्वजांची असे. जी दुरवस्था गाई, बकरी किंवा हरणे यांची व्याघ्रसिंहादी हिंस्त्र श्वापदांच्या पुढे होते, त्याहूनही अधम अवस्था पाशवावस्थेतील मनुष्याची असे. हरणे वगैरेंचा बचावकरिता शिंगे, दाढा, टापा वगैरे सहज शस्त्रे तरी असतात, मनुष्यांना तीही नाहीत. फक्त अकलेचे शस्त्र तेवढे मनुष्याजवळ जास्त, तेही बाह्य साधनाभावी प्रसंगी अत्यंत पंगू ठरते. अशा पंगू व दुबळ्या स्थितीत प्राचीन ऋषिपूर्वजांत मृत्युसंख्या किती भयंकर असेल तिची कल्पनाच करावी. अरण्यातील वानरांची वाढ ज्या अल्प प्रमाणावर होत असलेली आपण पाहतो तेच किंवा त्याहूनही अल्पतर प्रमाण पाशवावस्था माणसाच्या लोकसंख्येच्या वाढीचे असे. यूथातील लोकसंख्या जेमतेम आहे तितकी टिकली म्हणजे महद्भाग्य. मनुष्याची अशी किरकोळ संख्यावृद्धीची किती हजार वर्षे गेली असतील ते सांगवत नाही. कालांतराने हजारो टक्केटोणपे खाऊन व लाखो अवलोकनें करून व करोडा वेळा फसवून मनुष्याच्या, म्हणजे सर्वच मनुष्यांच्या नव्हे तर वैदिक ऋषि ज्यांच्यापासून जन्मले त्या पाशवप्राय ऋषिपूर्वजांच्या, उष्णकाली अरण्यात सहज पेटणा-या दावाग्नीने दग्ध झालेल्या वनस्पतींच्या निखा-यांची धग सहन न होऊन कृमिकीटक व गजव्याघ्र जीव घेऊन पळतात, ही बाब लक्षात आली व तिचा अनुभव घेऊन पाहण्याची कित्येक कल्पक ऋषिपूर्वजांना सुदैवाने बुद्धी झाली. रानातील जळकी कोलिते हत्ती, वाघ, सिंह, हरणे इत्यादींच्या अंगावर फेकिली असता, ती श्वापदे मनुष्याच्या वा-याला उभी रहात नाहीत, हा अनुभव ऋषिपूर्वजांनी प्रथम मिळविला. स्वसंरक्षणार्थ व शत्रुनिर्दालनार्थ कोलितांचा उपयोग करण्याचा शोध लागल्या दिवसापासून, पशुप्राय ऋषिपूर्वजांची उत्तरोत्तर आस्ते आस्ते संस्कृतीत प्रगती होत गेली. दावाग्नीने भडकणा-या रानांचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries