मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १२४

श्री.
पौ. अधिक वैशाख शुद्ध ५ शुक्रवार,
१६९६ चैत्र वद्य ८

अपत्यें तात्यानें दोनी कर जोडून सां नमस्कार विनंती. राजश्री त्रिंबकराव मामा यांस जखमा लागल्या होत्या. फुटून चैत्र वा ७ सप्तमीस देवआज्ञा जाहाली. मोठें वाईट जाहालें. राजश्री सेनासाहेब सुभा यांनी राजश्री बापूंस व नानांस पत्रें पाठविली आहेत. राजश्री दादांस पत्र लिहिण्याविषयी विनंती लिहिली होती. त्यावरून आज्ञा झाली कीं, पत्रें लिहिणें. चिंता नाही. त्यावरून त्यांसही पत्र यजमानांनीं लिा आहे. द्यावे. राजश्री बापूंनी रा दिनकरपंतांस पत्र तेथून लिहिलें होतें. त्यावरून त्यांस बहुत उत्कर्ष वाटला आहे. याचा प्रकार काय आहे हा शोध घ्यावा. मातुश्री दर्याबाई यांसही पत्रें तेथून आलीं आहेत, ह्मणून वर्तमान आइकिलें. त्यावरून सेवेसीं लिहिलें आहे. कळावें. येथें राजश्री हरीपंततात्यांनी दर्याबाईचे प्रकार तीन चार शकला काहाडल्या होत्या कीं, एक प्रकार कीं, कोणही प्रकारें राजश्री नानांस व बाईस एक करून द्यावें; दुसरें, बाईनीं फौज आपली आह्मी सांगूं तिकडे तैनात करून द्यावी आणि आपण तीनशें चारशें राऊतांनिशी आपले गोटांत येऊन रहावे; तिसरा प्रकार बाईनीं तिनशें स्वारांनिशी आपण पुरंधरास जावें, फौज येथें ठेवावी, अगर फोडून फाडून सांगों त्याप्रमाणें तैनातीस द्यावी. त्यास या तिहीं गोष्टींतून एकही प्रकार त्यांजकडून घडत नाहीं. एक होणें, तेव्हां टिक्का चिरंजीवाचे नांवें असावा ह्मणतात. लोक तैनातीस देऊन आह्मीं तिनशें स्वारांनिशीं कैसे राहावे ? लोक तैनातीस कैसे जातील ? ऐसें ह्मणतात. पुरंधरास जाणें उचित. परंतु तीनशें स्वारांनिशीं जाणें कैसे घडेल ? घाटगे, निंबाळकर, घोरपडे, मान्ये, जाधव वगैरे हे आमचे मानपुरुष. हे तर समागमें घेतले पाहिजेत. दोन अडीच तीन हजार निदानीं समागमें येतील, ते घेऊन जा ह्मणाल तरी जातों व-हाडचीं पथकें आहेत. ती येथें ठेवितों. ऐसें उत्तर जाहालें. त्यास, तीनीं उत्तरें कठीणच. पुरंधरास तीन हजारानिशीं रवाना करणें सला नाहीं. व जातील हा भरंवसा नाहीं. मार्गातून गच्छ केल्यास काय करावे ? समागमें आपली फौज द्यावी तरी निवडक फौज तीन हजारास, यांची साहा हजार असेल तेव्हां उपयोगी. नाहीं तर ठीक नाहीं. ऐसें आहे. त्यास अद्यापि निश्चय बाईचा होत नाहीं. यामुळें आपले फौजें (तील) लोकांची खातरजमा पुरवत नाहीं. फितुरी फौज समागमें घेऊन लढाईस जाणें उत्तम नाहीं ऐसे सर्वी सर्वत्र ह्मणतात. राजश्री तात्याही कोणे प्रकारें दर्याबाईचा बंदोबस्त करून, सडे होऊन, पाठलाग करणार, त्या सैन्यांतील वर्तमान तर रा नरसिंगराव धायगुडे आपले ध्यारशें राऊतांनिशीं नगरास येऊन दाखल जाहाले. रा कुशाबा पानशे, दरोगे तोफखान्याचे, आज येथें येऊन दाखल जाहाले. पाऊणशें राऊत समागमें आहेत.

दावल माहोत व बाळा माहोत पागेसुद्धां त्या सैन्यांतून निघाले म्हणून वर्तमान आहे. येथें येऊन दाखल होतील तेव्हां खरें. श्रीमंतांकडे दोन पथकें नवीं येऊन सामील जाहालीं. एक ताकपीर, दोन हजार फौज गायकवाडाकडील व लांबहाते शिंद्याकडील दीड हजार फौज. एकूण तीन साडे तीन ( हजार ) फौज नवी सामील जाहाली. ह्मणून वर्तमान आईकिलें, राजश्री भवानराव प्रतिनिधी यांची रुकनुद्दौला यांची भेट जाहाली. उदयिक बंदेगानअल्लीचीही भेट होणार आहे. प्रतिनिधीजवळ तीनशें राऊत आहेत. कळावें. वरकड वर्तमान वरचेवर होईल तें मागाहून लिा पाठवीन. शेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries