मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

ते पत्रें पावतील न पावतील याजकरितां हालीं हि सेवेसी लेखन केलें असे. रोज गुदस्त राजश्री विष्णुपंतबाबांची पत्रें आलीं तेथ मजकूर कीं ‘श्रीमंत नानांनी व आम्हीं उलेख करून श्रीमंत स्वामीस देहावरी आणिलें आहे. परंतु तूर्त द्रव्य साहा लक्षपर्यंत द्यावें लागतें. आणि फडणिसीचा प्रकार हि द्रव्यद्वारा केला पाहिजे.’ ऐसें विस्तारें लेखन केलें त्यास आपण स्वताच प्रसंगीं असलिया आम्हांस सेवक लोकांस काळजी किमर्थ असावी ? परंतु त्यांचें लिहिल्यांत आलें कीं ‘तुम्हाकडील पत्र आलियावर नाना व आम्ही हा उद्योग करूं’ त्यास पुर्ता पक्का विचार श्रीमंत स्वामीकडील करून घ्यावा आणि सरदारांची वस्त्रें वरकड बंदोबस्त करून घेऊन साहा लक्ष परियंत करार करून साऊकारी निशा द्यावी. आणि आम्हांवरी चिठ्या कराव्या. फडणिसीचा हि प्रकार द्रव्यद्वारें होईल तेथवर करावा. आणि बंदोबस्त करून घ्यावा. यांत कमीजास्त थोडें बहुत असलें तरी आपण करावें. हा सावधगिरीचा अधिकारहि आपणांस आहे. केवळ आम्ही ल्याहावें ऐसाहि प्रकार नाहीं. दुसरे रा। विष्णुपंत आबांनीं व शिवाजी विठ्ठल यांणा लिहिलें होते कीं, ‘देशीचे महाल आहेत, ते नानाकडे सोपून द्यावें, त्याजवरून देशीं माहाल आहेत त्याचीं पत्रें पाठविलीं आहेत. ते सेवेसी शिवाजी विठ्ठल प्रविष्ट करितील. त्यास देशीं कमावीसदार जुने आहेत त्यांणीं मागील बाकी झाडून व साल मजकूराच्या रसदा दिल्या तरी घेऊन तेच कमावीसदार ठेवून आपुलें कार्य करावें. तो प्रकार न जाला तरी नवे कमावीसदार ठेऊन स्त्रो घ्यावे आणि सरकारची सरबरा करावी. बाकी राहील त्याच्या चिठ्या आह्मांवरी कराव्या. आम्ही येथें तर्तूद करून देऊं. मात्र दरबारचा बंदोबस्त उभय पक्षीहि चांगला करून घ्यावा. येविशई श्रीमंत राजश्री माहादजीबावाचेंहि पत्र आपणांस आहेच. येथ सर्व प्रकार स्वामीचा आहे. दुसरा अर्थ किमपिहि नाहीं. हें जाणून या सरदारीची किफायत हरयेकविशी करावी, हें आपणांस विहित असे. वारंवार लेखन करावें ऐसें नाहीं. कितेक प्रकार राजश्री शिवाजी विठ्ठल हे विनंती करतील ते मान्य करून कर्तव्य ते करावें. सारांश उभयतां* श्रीमंतांची कृपा संपादून घेऊन सरदारीची वस्त्रें घ्यावीं. यांत आपला नक्ष आहे. कदाचित देशचे माहालांत ऐवजाची सरबरा न जाली तरी क्षेप-निक्षेप तुह्मीं साउकारी निशा देऊन आम्हांवरी हुंड्या कराव्या. ऐवजाची सरबरा येथें करून देऊं. कोणेहि गोष्टीचा चित्तांत याउपर दुसरा अर्थ न आणतां हे कार्य करावें. वरकड इकडील सरदारीचा प्रकार येथास्थीत जाला असे. अगोधर हजार फौज होतीच आणिक दाहाबारापर्यंत फौज मागाहून आली. शिवाय पागा वगैरे मिळोन वीस हजार फोज बरोबरी आहे. त्यास नालबंदी व समजाविशीहि करोन कोटियानजीक आलों आहो. कोटेकराकडील हि मातबर माणूस आले आहेत. येथील मामलत जालियावर होळकराकडे जावें लागतें. तिकडीलहि पत्रें आलींत कीं फिरंगियांची व यांची लढाई जाली-होळकर माघारीं कालपीस येऊन दाखल जालें. त्याजकडेहि त्वरेनें जावे लागतें. तिकडीलहि राजकारण भारी आहे, तेहि आपले कृपेकडोन साधून नक्ष आपलाच होईल. चिंता नाही. आपण अभिमान न सोडावा यांत उत्तम असे. स्वामींनी++ लिहिल्याप्रमाणें पारपत्य केलें, याउपरीं दरबारचा बंदोबस्त जो करणें तो करून घ्यावा. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries