मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ सवा खमसैन मया व अलफ सन ११६६, फसली,
अवल साल छ ५ रमजान, ४ मे १७५६,
ज्येष्ठ शुध्द ६ शके १६७८.

छ १० जमादिलाखर (१ जानेवारी १७५७) श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेबसुध्दां श्रीरंगपट्टणचे स्वारीस तोफखाना वगैरे फौजेसहित निघाले. कर्नाटकांत जाऊन संस्थानिकांकडील खंडण्या किरकोळ घेणें त्या घेऊन पुढें श्रीरंगपट्टणास गेले. तेथे ह्मैसूरचा राजा याचा दिवाण त्यावेळेस नंदीराज असतां श्रीमंतांनी मोर्चे लावून सत्तावीस दिवस तोफांचा मार पठाणावर झाला. भाऊसाहेब मोर्चात होते. रंगस्वामीचे देवालयाचे शिखरास गोळा घालून तोफा फुटून माणसें जाया झाली. नंतर पठाणापासून खंडाचें बोलणे लागलें. दरम्यान, महादशेट वीरकर, सरकारचे शेटे मध्यस्थ होते, त्यांचे विद्यमानें खंडणी छत्तीस लक्ष ठरली. तह होऊन त्यापैकी पांच लक्ष रोख घेऊन बाकी ऐवज फिटेतोपर्यंत महाल लावून घेतले होते. नंतर पेशवे यांचे मनांत आलें की, पूर्वी मराठ्यांकडे जितका मुलूख होता तितका घ्यावा. त्याप्रमाणें स्वारी करून छ ३ रज्जब रोजीं (२४ मार्च १७५७) चिनापट्टण घेतलें. शिरें परगणाही घेऊन पर्जन्यकाळ जवळ आला, सबब बाकी राहिलेले परगणे हुसकोटा व बेंगरूळ व बालापूर व कान्हेरे हे परगणे घेण्याकरितां त्या प्रांती कांही फौज बळवंतराव गणपत मेहेंदळे यांजपाशीं ठेवून, छ २७ साबानास (१६ मे १७५७) मुतालिकी शिक्का त्यास देऊन परत पुण्यास निघाले. तुंगा व कृष्णा नदीस पूर असतां यांनी वाट दिली, हें कौतुक सर्वांच्या दृष्टीस पडले. मजल दरमजल २७ दिवसांत पुण्यास आले. परत येतांना बेळगावचा किल्ला नबाब सावनूरकर यांणीं तहात पेशवे यांस लावून दिला होता, परंतु तो किल्ला इसुफ बेग किल्लेदार याजकडे होता तो हस्तगत करून घेण्याकरितां बेळगावास येऊन, छ १४ साबानास (३ मे १७५७) किल्ला सर केल्याची खबर लागतांच तेथील बंदोबस्त करून किल्लेदार यास किल्ला घेतेसमयीं कांही गांव देण्याचें कबूल केलें होतें, त्याप्रमाणें कसबे हुकेरी हा गांव या सालीं दिला; परंतु पुढें चिकोडी मनोळी तालुके करवीरकर संभाजी राजे यांची राणी जिजाबाई साहेब यांस अर्बा सितैनांत दिले, त्यांत हुकेरी हा ठाण्याचा गांव होता तो त्याजकडे गेला, सबब त्याचेमोबदला त्याचे चिकोडी तालुक्यांतले मौजे बलतवाड व गोडवाड व मसरमुदी हीं तीन गांवे त्या हुकेरीच्या आकाराचे मानानें त्यास दिले. ते आजपर्यंत याचे वंशजांकडे चालत आहेत. बेळगाव किल्ला घेऊन पुढें मजल दरमजल स्वारी पुण्यास रमजान महिन्यांत आली. जनार्दन बल्लाळ फडणीस वृध्द झाले, सबब त्यांचे पुत्र बाळाजी जनार्दन ऊर्फ नाना फडणीस यांजकडे फडणीशी छ ६ रबिलालवल, मार्गशीर्ष शुध्द ८ सोमवार (२९ नोव्हेंबर १७५६) सांगितली. पुढें लवकरच जनार्दन बल्लाळ वारले. मुलतान व लाहोर प्रांत इराणी बादशहाकडून सन् खमस खमसैनांत परत दिल्लीचा वजीर शाबुद्दीन यांणी घेतले. नंतर दुसरे वर्षी पुन: त्या इराणी बादशहानें परत घेऊन स्वारी करून दिल्ली शहर घेऊन नजीबउद्दवला यास तेथें ठेवून आपण माघारा आपले जागीं गेला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries