मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

परंतु पुढे सावनूरचे स्वारीत त्याणीं मोठा पराक्रम केला, सबब बारा लक्ष रुपये बुंधेले यांजकडून विठ्ठल शिवदेव यांस देवविले. महादाजी शितोळे यांनी मोठा पराक्रम केला. त्यांस मिरज प्रांती मौजे मांजरी प्रांत कागल हा गांव इनाम दिला. अप्पाजी मुळे यांसही गांव इनाम दिला. पागा सांगून पागेची सरदारी दिली. विठ्ठल शिवदेव हे दिल्लीस आल्याबरोबर हिंदुस्थानांत जनकोजी शिंदे व माळव्याचे बंदोबस्तास मल्हारजी होळकर व दत्ताजी शिंदे यांस फौजेनिशी ठेवून, आपण व विठ्ठल शिवदेव व सखाराम भगवंतसुध्दां परत पुण्यास १ जिल्काद श्रावण शुध्द ३ (१० आगस्ट १७५५) रोजीं दाखल झाले. चिंतो विठ्ठल बराबर होते. छ १३ माहे मोहरम सत्रा दिवस (२० आक्टोबर १७५५) भाऊसाहेब व नानासाहेब व विश्वासराव याप्रमाणें तिघे खासे सावनूरचे स्वारीस निघाले. बराबर विठ्ठल शिवदेव व नारो शंकर राजेबहाद्दर व भोसले, होळकर व नबाब यांजकडीलही फौज घेतली. मोठे जमावानिशीं निघाले. ही स्वारी करण्याचें कारण:- फ्रेंच लोकांचा सरदार बूसी याचे फौजेंत मुजफरखान नामें सरदार होता. तो सन १७५० चे सुमारे पेशवे सरकारांत चाकरीस राहून कांही पलटणें कवायती तयार करी. पुढें यास कर्नाटकांत महादाजी अंबाजी पुरंदरे याजबरोबर पाठविला होता. त्यावेळेस कांही तंटा होऊन तो रुसून श्रीरंगपट्टणास गेला. तेथें कांही रोजगार मिळाला नाहीं. मग सावनूरकर यांचे पदरी नोकरीस राहून कवाईत फौज तयार करून तोफा वगैरे सामान करू लागला. हे वर्तामान पेशवे यांस कळतांच त्यांनी त्या नबाबापासून त्यास आपलेकडे परत मागत असतां त्याणें त्यास परत दिल्हे नाहीं. मसलतीस घोरपडे गुत्तीकरही अनुकूल होतें. स्वारी सावनुरास दाखल होऊन वेढा दिला. फौज पाठवून खाली लिहिल्याप्रमाणें पेशवे यांणी आपली ठाणीं बसविली. छ २८ रबिलावल रोजी (१ जानेवारी १७५६) शहापूर व बेळगांव विठ्ठल विश्राम याणी फत्ते केल्याची खबर आली. याच महिन्यांत बागलकोटवर लढाई होऊन फत्ते झाली. महाल सरकारांत घेतला. छ २९ जमादिलावल रोजी (१ मार्च १७५६) परगणें मिश्रीकोट घेतला. येणेंप्रमाणें महाल घेऊन, सावनुरावर लढाई होऊन, सावनूरचा तट पाडून, किल्ल्यांत फौज शिरून, सावनूर किल्ला सर केला. त्यांत विठ्ठल शिवदेव यांनी बहुत पराक्रम केला. सबब त्यांस चौघडा व जरीपटका व साहेबनौबत व जरीलगी अशी राजभूषणें देऊन, पोषाख व जवाहीर वगैरे दिले. या लढाईत विठ्ठलराव यांस तरवारीची जखम खवाट्यावर लागली होती. पुढें नवाब सावनूरकर शरण येऊन सल्ल्याचे बोलणें लाविल्यावरून एकंदर त्याचे मुलुखापैकी निम्मे मुलूख त्याजकडे कायम ठेवून निम्मे पेशवे यांनी खाली लिहिल्याप्रमाणें महाल घेतले ते येणेंप्रमाणे :- १ परगणे कुंदगोळ, २ परगणे रायर हुबळी, ३ पेठ मजीदपूर, ४ परगणे मिश्रीकोट, ५ समत तडस, ६ अडती सामापूर, ७ शेरवड सरदेशगत, ८ परगणे हुबळी, ९ समत कालघडगी, १० बेमीनीये देखील नेळीहरदी, ११ परगणे गदग, १२ सरदेसगत धारवाड, १३ परगणे लखमेश्वर, १४ परगणे मुलगुंड, १५ कसबे बेहट्टी, १६ कर्यात देवरहुबळी, १७ परगणे बागलकोट देखील ब्रीलदी, १८ उदीज बेटिगिरी, १९ कतीकटे देखील कटकीर, २० कसबे अमीनबाब, तळवई वगैरे, २१ तपे तडकोट, २२ कर्यात नरेंद्र, २३ तपे शिराळें, २४ तपे नवलगुंड २५ छत्तीगीर मुरगोड, २६ कोयळी असोडी देखील करीकळे, २७ लुमेडी, २८ किल्लेहुळी, २९ तपे दोवळी, ३० कोळवड, ३१ परगणे अमजनगर, ३२ परगणे अजमनगर, ३३ परगणे पाछापूर, ३४ परगणे पाछापूर, ३५ परगणे संपगांव.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries