मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ सीत खमसैन मया व अलफ,
सन ११६५ फसली, ५ जून १७५५, अधिक
ज्येष्ठ वद्य ११ शके १६७७.

विठ्ठल शिवदेव श्रीमंत दादासाहेब यांजबरोबर कुंभेरीचे किल्ल्याचे हल्ल्यासमयीं अर्बा खमसैनांत होते. पुढें कांही दिवसांनी त्यांची बायको वारली. सबब दुसरे लग्न करण्याकरितां कालपीस वधू पाहून ठेविली होती. तेथें आज्ञा घेऊन सर्व स्वारीनिशी गेले. लग्न करून परत दिल्लीस जाताना वाटेंत ग्वालेर येथे मुक्काम पडला. ते समयीं बरोबरचे स्वार वगैरे लोक कही ह्मणजे दाणावैरण वगैरे जमविण्याकरितां बाहेर हिंडत असतां जाटांची गांठ पडली. त्यांनी ते लोक कैद करून ठेविले. हें वर्तमान विठ्ठलराव यांस कळतांच त्यांनी आपला वकील जाट राजाकडे लोक सोडविण्याकरितां पाठविला. तेव्हां जाटांचे कारभारी यांनी त्याचा असा उपमर्द केला कीं, एक वेळ तुह्मांस कुंभेरीस जय मिळाला यामुळें फारच चढला, आणि आह्मांसारख्या शूर जाटांच्या राज्यांत शिरून हें वर्तन करता, तें तुमच्या नाशास कारण आहे. तुह्मीं ब्राह्मण, शूरत्वाचा विषय तुमचा नव्हे, आह्मी तुह्मांस व तुमच्या मालकास ओळखतों, तुह्मीं परवानगीवांचून आमचे राज्यांत मुक्काम केला, सबब माफी मागाल तर आमचे राजे तुह्मांस ब्राह्मण ह्मणून माफी देतील. असे भाषण ऐकून वकील परत आला. नंतर लढाईची सिध्दता करून दिल्लीहून आपली फौज व तोफखाना वगैरे सरंजाम आणून व कांही नवीन फौजही ठेवून लढाईस आरंभ झाला. लढाई होतां होतां अखेर निकराचे युध्द होऊन, महादजी शितोळे, यमाजी रहाळकर, मोतीराम वाणी, ब्राह्मण व आणखी दुसरे मानकरी जाट राजाचे घोड्यापर्यंत जाऊन पोहोंचले. तेव्हां महादजी शितोळे याणें जाट राजास घोडयावरून खाली पाडलें. त्याच संधीत विठ्ठलराव शिवदेव यांणी त्याचे छातीवर पाय देऊन त्याचा शिरच्छेद केला. मग किल्ला सर करून त्याजवर पेशवे सरकारचें निशाण चढविलें. किल्ला घेऊन बंदोबस्त केल्यावर जाट राजाचा पुत्र, राजा गीरधर, कारभारीसुध्दां, विठ्ठल शिवदेव यांजकडे शरण आला. तेव्हां ज्या कारभा-यानें पूर्वी दुर्भाषणें केलीं होतीं त्यास बोलावून विचारलें कीं, आता शूरत्व हा विषय ब्राह्मणांचा आहे की कसें ? असें बोलिता कुंठित होऊन उगीच बसला. मग किल्ले ग्वालेर व त्याजखालील मुलूख पेशवे सरकारांत येऊन गोहद संस्थान त्या राजपुत्रास देण्याचें ठरलें. किल्ला व किल्ल्याखालील महालाची मामलत गोविंद शामराव शिरवळकर यांजकडे सांगून परत दिल्लीस दादासाहेब यांच्या स्वारीत गेले. हा किल्ला विठ्ठलराव शिवदेव याणीं सर केल्याविषयीं छ ७ जिल्काद (१६ आगष्ट १७५५) पेशवे यांस खबर कळली. किल्ला घेण्याविषयीं पेशवे यांची परवानगी न मागता सर केला. त्यास बारा लक्ष रुपये खर्च झाला होता. तो तुह्मास * मिळणार नाहीं असें श्रीमंतांचे बोलणें झालें. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries