मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३८०]                                                                       श्री.                                                      २३ मार्च १७५१.

वेदशास्त्रादिसंपन्न श्रीमंत राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति. सेवक देवजी नागनाथ साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल त॥ चैत्र शुध्द ८ जाणोन स्वकीय निजानंद लेखनाज्ञा कीजे. विशेष. श्रीमंत पंतप्रधान स्वामी फौजेसह वर्तमान रघुजी भोसले व र॥ फत्तेसिंग भोसले यांचे फौजेसुध्दां हैदराबादपुढें सात मजला ताम्राचे फौजेसंनिध सात कोशीचे तजावजीनें पानगळानजीक मुक्काम केला. पांच सात रोज मुक्काम होते. ताम्रासमागमेंही वीस हजार फौज फिरंगीसुध्दां आहेत. सेवेसी जानोजी निंबाळकर दरम्यान येऊन सतरा लक्षांवर मुकदमा चुकला. पैकी दोन लक्ष नक्त दिल्हे, तीन लक्षांची वरात भागानगरावर, बाकीची वरात औरंगाबाद व बऱ्हाणपूर यांजवर देविली आहे. जफ्ती खानदेश वगैरे कुल मोकळी करावी ऐसा निश्चय जाला. स्वामीस श्रुत होय. ताम्रही भागानगरास आज उद्यां कूच करून जाणार. श्रीमंतही कृष्णातीर धरून सप्तऋषीस जाणार. कुच छ ६ अगर छ ७ जमादिलावली होणारसें मुकरर आहे. ते प्रांतीं दमाजी गायकवाड गेला ह्मणोन वर्तमान श्रीमंतांस विदित जालें आहे, यामुळे जातात. मागें एक दोन पत्रें लिहिली; परंतु उत्तर न आलें. तरी येणारासमागमें पत्र पाठवून सेवकाचा परामर्ष करीत असिलें पाहिजे. मी सेवक पदरचा आहे. मजवर कृपा करीत जाणें. बहुत काय लिहूं हे विनंति.

पु॥ विनंति उपरि राजश्री रामदासपंताशीं व श्रीमंताशी भेट जाली. श्रीमंतांनी एक हत्ती व एक घोडा व मोत्यांचा चवकडा आणीक वस्त्रें त्यांस दिधली. कळलें पाहिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries