मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

शिष्टाचाराच्याच गोष्टी करून आणीक चर्चा केली नाहीं. खर्चास नाहीं. खर्चाकरितां श्रमी आहे. कर्ज धुंडितो आहे. यानंतर येथें सर्वांनीं क्षौरपूर्वक प्रायश्चित्तें केलीं. गोविंदभट वझा एकलाच राहिला आहे. कराडे पांच सात आहेत. तेही आठा पंधरा दिवसांत उतरतील. बहुत फजित जाहले. बाळंभट वझे आदिकरून ज्यांहीं प्रायश्चित्तें केलीं, त्यांचे सर्वांचे रुपये वर्षासनाचे दिल्हे. साता वर्षांचा हिशेब कुल करून, पेशव्यांकडून जनोबाची यात्रा घेऊन रामचंद्रपंत आला होता तें सर्व दानधर्म आमच्याच विद्यमानें जाहाला. पेशव्यांहीं पत्र आह्मांस लिहिलें होतें. त्यांसही सांगितलें होतें, जें करणें तें दीक्षितांच्या विद्यमानें करणें. तेणेंप्रमाणेंच केलें. ते आठा चहूं दिवशीं अमृतरायाबरोबर देशास जातील. त्यांस वर्षासनाचा साता वर्षांचा हिशेब पाठविला आहे, समजाऊन दिल्हा. त्यामध्यें नानांहीं नवीं वर्षासनें केलीं व पेशव्यांहीं सनदा नव्या केल्या व गतकुलें जाहालीं. हें सर्व लिहोन पाठविलें आहे. त्यामध्यें आपले पदरचे रुपये ७२५ जाजती दिल्हे आहेत. त्याच्या हिशेबाची नक्कल करून मागून तुह्माकडे व कबजें ब्राह्मणाचीं पाठवितों व वर्षासनाचा ऐवज गोविंदपंत पाठवीत नाहीं. मागील राहिलें होतें तें दोन चार पत्रें पाठविलीं तेव्हां आलें. आतां माघमाशीं दोन वर्षें होतील. चार वेळा गोविंदपंतास लिहिलें, परंतु ऐवज येत नाहीं. ऐवज येईल तेव्हां द्यावें. त्याहीनंतर जशी आज्ञा येईल तसें करूं. यानंतर प्राणनाथभट गाडगिळांचा तर कोठें शोध नाहीं. त्यांस तीन शत रुपये वर्षासन आहे. त्यांध्यें यंदा दोनशे रुपये त्याचे स्त्रियेस दिल्हे. शंभर बाकी आहेत. त्यांस त्यांची मातु:श्रीस उपोषणें पडतात. तिजला कपर्दिक देत नाहीं. यास्तव पेशव्यास पुसावें. जंव मातु:श्री आहे तंव तिजला शत रुपये देऊं. दोन शत प्राणनाथभटाचे स्त्रियेस देऊं. जशी आज्ञा करतील तसें करूं. याखेरीज पेशव्यांहीं यंदा वराता दिल्या आहेत. कृष्णराव धनुर्धारी याची पुतणी २५, गणेश दीक्षित ओक ५०, आत्मारामभट २५, वीरेश्वरभट केळकर ५० एकूण शंभराच्या सनदा घेऊन आले आहेत. येकूण सवा आठशे जाजती रुपये लागले. हे मजुरा घेणें. याचा ऐवज साल दरसाल गोविंदपंतावर घेणें. यात्रा यंदा मोहनसराईस आली. तेथें रात्रौ डाका पडला. सदाशिवभट इंगळे व नारो महादेव मुळे पारोळेकर मारले गेले. बाकी घायाळ बहुत जाहले. लुटले गेले. ऐसे कधीं न जाहलें तसें यंदा जाहलें. हें पूर्वी बापूजीपंतास सविस्तर लिहिलें आहे. हें पत्र त्वरेनें लिहिलें. मागाहून हरबाजी नाईक नवाळे यांचा काशीद दोहों चहूं दिवशीं निघणार त्याबरोबर वर्षासनाची ब्राह्मणांची कबजे व हिशेब पाठवून देऊं. वरकड हें पत्र त्वरेनें लिहिलें आहे. मागाहून सविस्तर लिहों. सुज्ञाप्रति बहुत काय लिहिणें. लोभ असो देणें. हे विनंति. मिति ज्येष्ठ वदि ८ मंगळवार, संवत् १८०८.*

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries