मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

तेव्हां दौलतराव शिंदे यांनीं स्वार व फौज देऊन हरिपंत भावे, हिंमत बाबूराव आंग्रे, यांची रवानगी केली. शके १७१९ मार्गशीर्ष मासीं कुलाब्यास दाखल जाले. तें लष्कर मौजे अशवी तर्फ खंडाळें येथें राहिले. जयसिंगराव आंग्रे हे लष्कर घेऊन हिराकोटांत येऊन राहिले. नागोजी आंग्रे हिंमतराव हा हरिपंत भावे यास फितूर जाला असें समजलें. त्यावरून नागोजीस ठार मारलें. पौषमासी हरिपंत याचा वेढा हीराकोटास पडला. कोटावर फार मारा चालविला. मनुष्यांस अन्नपाणी मिळणें बंद जालें. राव आंग्रे लष्करचा वेढा असतां राषी लोक घेऊन साखरेची खाडी उतरून कुलाब्यांत गेले. दुसरे दिवशीं हरिपंत भावे लष्कर घेऊन चेंऊलास आले. उभयतांची लढाई होऊन पंताचा मोड जाला. ही खबर ग्वालेरीस समजतांच शिंदे यांजकडून दुसरी फौज मदतीस आली. मानाजी व हरिपंत यांची लढाई जाली. मानाजी पळाले. राव आंग्रे रेवदंडयास गेले. पंतांच्या हस्तगत जाले नाहींत. बाबूराव आंग्रे यांनी यशवंतराव शिंदे सुभेदार किल्ले रेवदंडा यास फितूर करून, पाच हजारांचा गांव इनाम देऊन, मानाजीस धरिलें. बाबूराव आंग्रे यांस राज्याभिषेक शके १७२१ मार्गशीर्ष वद्य ८ स जाला. जयसिंगराव आंग्रे लष्कर ग्वालेर येथें अटकेंत राहिले. इकडे त्यांची बायको सकवारबाई खांदेरी किल्ला देईना. तेव्हां जयसिंगराव आंग्रे यांस परत आणतो अशी भाषा क्रिया करून बाबूरावांनी बाईपासून किल्ला युक्तीनें घेतला, शके १७२२ कार्तिक शु. ७ जयसिंगराव आंग्रे यांस घाटावरून आणून मार्गशीर्ष शु. ६ स सागरगडास जिवें मारिलें. मुऱ्हारराव आंग्रे मुंबईस पळून गेले. इकडे संस्थानचें काम हरिपंत भावे करूं लागले. ते हिशेब देतना. ह्मणून कैदेंत ठेविले. पुढे खंड घेऊन सोडून दिले, शके १७२३ चैत्र वद्य ६. बाबूराव आंग्रे पुण्यास गेले, तेव्हां यशवंतराव होळकर यांचा दंगा झाला. आंग्रे यांस लुटून फस्त केलें. तेथून पळून माणिकगढींत आले. तेथून कुलाब्यास कार्तिक शु. ५ स आले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries