मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

जयसिंगरावाचा मुलगा मुऱ्हारराव याणें मुंबईहून बच्याशेट सोनार यांस सेनापति करून लष्करसुध्दां १७२८ च्या माघमासीं कुलाब्यावर लढाई दिली. बाबूराव आंग्रे यांचे तर्फेचे लोक शेट मजकुरास फितूर झाले. दौलतराव बिन चिमाजी आंग्रे व महिमानजी बिन तुकोजी आंग्रे. हिराकोट व सागरगड दोन्ही किल्ले शेटजीनें घेतले. दोन चार लढाया झाल्या. परंतु शेटाचा मोड झाला नाहीं. तेव्हां मुत्सद्दी नरोत्तम शेट गुजर, बाबा घाटगे व बाबूराव शिरधर चेऊलकर असे होते. शेट आपले लोकांनिशी हिराकोटांत होता. त्यापैकी फतू जमादार सोरटी यांस एक लक्ष रुपये देऊं करून फितूर केला, आणि शेट यास धरून बाबूराव आंग्रे यांचे स्वाधीन केला. शके १७२९ वैशाख शु॥ ६ शेट, दौलतराव आंग्रे व महिमानजी आंग्रे यांस चेंढरें येथें डोंगरी आहे तेथें नेऊन जिवें मारिलें. रायाजी आंग्रे यांस सागरगडच्या तटावरून लोटून मारिले. रामाजी कोशा व बेंड वर्तक यांचें बंड झालें. त्यांस धरून त्यापैकी वर्तक यास खांदेरीत नेऊन जिवें मारिलें. मानाजी आंग्रे व कान्होजी आंग्रे हे बाबूराव आंग्रे यांचे अटकेस होते. बाबूराव आंग्रे यांचे तर्फेचा विनायक परशराम बिवलकर ऊर्फ बाबाजी यानें फितूर केला. त्यास जिवें मारावा, परंतु त्याचा बाप बाबूराव श्रीधर याच्या भिडेस्तव सोडिला. बाबूराव घाटावर शिंद्यांच्या लष्कराकडे जात असतां, भगेंद्र पडून शके १७३५ श्रावण वद्य ५ स वारले, जामगांवी. मानाजी आंग्रे समागमें होते त्यांनी क्रिया केली. मानाजी शके १७३६ श्रावण वद्य ५ पासून १७३९ पर्यंत राज्यासनी होता विनायक परशराम बिवलकर कारभारी. आमचा आह्मीं कारभार करूं कारभारी नको, असें पत्र आंग्रे यांनी पेशव्यांस लिहिल्यावरून, पेशव्यांनी विश्राम भाटकर पाठवून दिला. पांडुरंग शिवा व गटा सरदार हे भाटकरांस जाऊन पुढें भेटले. भाटकरांचा जोर समजला. भाटकरास कैद करून १७३७ चे ज्येष्ठ मासीं जिवे मारिलें. बिवलकर व मानाजी आंग्रे सरखेल यांची अति चुरस लागली. शेवटी मानाजी १७३९ च्या कार्तिक माशीं वारले. यांचे पुत्र राघोजी. यांचा अंमल १७३९ मार्गशीर्ष शुध्द १० पासून १७६० पौष शुध्द १० पर्यंत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries