मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

अष्टमीचे दिवशीं रविवारीं दोन प्रहरीं गोखले याजकडील आरब व सरकाचे गोसावी याणीं जाऊन येलवडे गांव घेऊन आंत आरब व गोसावी शिरले. तेव्हां मोठे कलागतीस आरंभ जाहाला. ते दिवशीं पेशवे याचा लढाईचा बेत नव्हता. परंतु त्याचा नेट पडला. तेव्हां * * * * *. पुढें तोफखान्या परियंत यांणीं * * * * *. यांणीं गणपतराव पानशे यांसी सांगितलें कीं माहांकाळीचे बार काढावे. तेव्हां पानशे यांणीं तोफांची सुरुवात केली. आणि आरब व गोसावी यांणीं पुढें लढाईची शर्त केली. मागें तोफांचा भडमार होत आहे. इंग्रज बहादर याणेंहि आपले लढाईची शर्त करीत करीत पुढें चाल धरीत चालले. असें वर्तमान आवशीस रविवारीं प्रहर रात्र परियंत जाहालें. पुढें गोखले व पुरंधरे यांशीं कांहीं फितूर असें समजलें आणि श्रीमंत याणीं पळ काढिला तो बापदेवाचे घाटांत जाऊन उभे राहिले. विंचुरकर पुरते फितुरी असें समजण्यांस आलें. गणेशखिंडीकडे मिसल त्यांची होती. त्यांनीं तिकडून वाट दिली. असेंहि जाहलें. स्वारी बरोबर माधवराव रास्ते व चिंतामणराव आपा ऐसे उभयतां गेलें. तेव्हां फौजेचा भणभणाट जाहाला. त्यास उपमा द्यावयास सुचत नाहीं. पुढें दोन प्रहर रात्रीं फौजेचा जिकडे तिकडे भणभणाट जाहला. तेव्हां ठिकाणीं गोखले व पुरंदरे व नारो विणू मात्र राहिले. त्याजपाशीं फौज सुमारी दहा पाच हजार राहिली. ते वेळेस असें अवघड पडलें कीं तोफा कशा निघतात. ते वेळेस पानशे याणीं तोफा काढिल्या. आणि तळावर तोफा दोन राहिल्या, एक महांकाळी व दर्याभवानी ऐशा दोन तोफा राहिल्या. बाकी तोफा सु॥ १० घेऊन गणपतराव सिहिगडास गेले. रात्र मागील पाच घटका राहिली. तों इंग्रज याणीं विंचुळकर होते ते बाजूनें चाल केली. ते वेळेस फेर जी झडली तिची गणीत नाहीं. इकडूनही घोडयांचे तोफांचे व दोन तळावर राहिल्या त्यांचे बार एक सरबत्ती केली. आणि काढावा काढिला तों प्रात:काळ जाहला. आबा परंधरे याणीं (महांकाळी काढण्याची आज्ञा दिली) तों फिरंगी याजकडील तोफेचा गोळा दहा हातावर पडला. तैसेच गोखले व पुरंधरे उभयतां निघाले. ते स्वारीचा शोध करीत करीत सासवडास गेले. तेथें सारे जमुनी जेजुरीस गेले. तेथून पुढें जात जात माहोलीचे मुक्कामास गेले. तेथून पुढें पाडळीस जाऊन मुक्काम केला. आतां मागील पुणेकडील मजकूर. मागें शु॥ नवमी सोमवार ऊन पडतां बेटांत पलटणें शिरलीं, आणि तेथुनीं गोळे तोफांचे दोन टाकिले. ते हरी चिंतामण दीक्षित यांचे घरास लागले. एक गोळा तीन भिंती फोडून व तावदान फोडून पार गेला. गावांत बातमी कीं रूपराम चवधरीचीं पलटणें आहेत. इतकियांत घटका दिवस आला. तों बुधवारचे रस्त्यानें हजार स्वार पळत गेला. लोक बातमी बोलूं लागले कीं त्याचे कुमकीस हे स्वार जातात. ऐसें होतां होतां चार घटका दिवस आला. फिरंगी याणीं सरकारचें डेरे येऊन जाळले आणि त्या तळावर आला. माहांकाळी तोफेचा व दुसऱ्या तोफेचा गाडा जाळिला आणि पाहों लागले तों काण्यांत खिळे ठोकिले आहेत. गावांत आईस लेकरूं पुसेनासें जाहालें. पळ असा निघाला कीं रस्त्यांत वाट मिळेनाशी जाहाली. कोणी पर्वतीचे डोंगरांत, कोणी कोणीकडे, ऐशीं गेलीं. नवरा एकीकडे, बायको एकीकडे, पोर एकीकडे, ऐशी अवस्था जाहाली. गावांत बातमी, आतां पुणें जाळितो, आतां लुटतो. इतकियांत गोसावीपुऱ्यांतील बंगला पेटविला. त्यानें लोकांची फार हवालदिलता जाहाली. त्या समयास उपमा घ्यावयास राहिली नाहीं. इतकियांत एक सांडणी स्वार आला कीं गोखले याची हवेली कोणती पुरंधरे याची कोणती असें पुसत बुधवार रस्त्यानें गेला. चारी सरकारचे (वाडे ओस पडले.) एक शूद्र ब्राह्मण राहिला नाहीं. त्यांत एक कारकून व पाच पहारेकरी मात्र राहिले. विश्रामबागचे वाडयांत दिनकर जोग पहारेकरी व मराठी माणसें ऐशीं दीक्षित दी॥चीं होतीं. बुधवार वाडयांत कोणी नाहीं. भृगुवार वाडयांत हि कोणी नाहीं. असें जाहालें, तों दिवस दोन प्रहर जाहाला. पुढें बातमी गावांत ऐशी आली कीं इंग्रज नाकेबंदी करितो. बाहेर कोणास जाऊं देत नाहीं. तेव्हां जी गावचे मनुष्यांची गत जाहाली ती ईश्वरास ठावूक. पुढें दिवस दोन प्रहर पाच घटका जाहाला, तों गावांत दवंडी आली कीं द्वाही बाबासाहेब व हुकूम कुंपणी बहादर यांचा, लोकांनीं दुकानें उघडावीं, आमचे कडून रयतेस उपद्रव होणार नाहीं. ऐशी द्वाही आली. आणि हरेश्वरभाई यांसी अल्पिष्टीन साहेब याणीं बलावून नेलें. आणि विश्रामबागचे वाडयातील पहारेकरी दिनकर जोग यासी बलाविलें. उभयता तेथें गेले तों बाळाजीपंत नातू व आणखी चार साहेब असे बसले होते.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries